चौकशीची घाई का, अशी विचारणा करणाऱ्या आयपीएस रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ

सायबर पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना दुसरे समन्स पाठवण्यात आल्याची सूञांची माहिती आहे.
 Rashmi Shukla .jpg
Rashmi Shukla .jpg

मुंबई : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला, यांना मुंबई पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावला होता. त्यानुसार बुधवारी (ता. २८ एप्रिल) चौकशीला हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना चौकशीला हजर राहता येणार नसल्याचे सांगितले होते. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असे रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलला सांगितले होते.

त्यानंतर सायबर पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना दुसरे समन्स पाठवण्यात आल्याची सूञांची माहिती आहे. या दुसऱ्या समन्स नुसार शुक्ला यांना ३ मे रोजी हजर राहण्याचे आदेश सायबर पोलिसांनी दिल्याचे कळते. सायबर पोलिसांनी हैद्राबादच्या निवास स्थानी समन्स बजावले आहे. त्यामुळे शुक्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी तत्कालीन गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालावरून राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले होते. हा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी २७ मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. 

मुंबईतील सायबर पोलिस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरसंदर्भात हे समन्स बजावण्यात आले आहे. हे फोन टॅपिंग प्रकरण घडलं तेव्हा शुक्ला या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्या संदर्भात त्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत हैद्राबाद येथे बुधवारी सीबीआयने रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. त्या चौकशीत शुल्का यांनी अनेक गौप्यस्फोट केले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळर यांनी म्हटले होते.

त्या संदर्भात भातखळकर यांनी एक ट्वीट केले होते. त्यामध्ये ते म्हणाले होते की ''आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये CBI चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे'' असा टोला भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकाला लगावला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com