मुंबई: गणेशोत्सवकाळात कोरोनाचा फैलाव होऊ नये तसेच उत्सवाबाबत शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन व्हावे म्हणून शहरातील लोकप्रतिनिधींनी मंडळांना छोट्या गणेशमूर्ती व पूजासाहित्य दान करण्याचा संकल्प सोडला आहे. मात्र याचबरोबर उत्सवासंदर्भात शासनाने सांगितलेल्या अटींचे मंडळांनी काटेकोरपणे पालन व्हावे, अशी अपेक्षाही या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
दहीसरच्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे व रिद्धी भास्कर खुरसंगे यांनी हा संकल्प सोडला असून लवकरच शहरातील इतर लोकप्रतिनिधीदेखील याचे अनुकरण करण्याची शक्यता आहे. कोणती मूर्ती हवी हे मंडळे निश्चित करणार असली तरी त्यांचा पुरवठा हे लोकप्रतिनिधी करणार असल्याने मूर्तीकारांनाही दिलासा मिळणार आहे. एरवीही बरेच लोकप्रतिनिधी बऱ्याच मंडळांना दरवर्षी या ना त्या प्रकारे पाठबळ देतातच, त्याच मालिकेत आता त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
सध्या कोरोनाच्या फैलावामुळे जगाचेच अर्थकारण बिघडले असल्याने अर्थातच भाविकांवर आणि गणेशोत्सव मंडळांवरही त्याचा वाईट परिणाम झाला आहे. लोकांना रोजगार नाही, व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये मालाला उठाव नाही, अशा स्थितीत मंडळांना यावर्षी उत्सवासाठीच्या देणग्या व जाहिरातीदेखील कमी मिळतील, अशी भीती आहे. अर्थात यंदा गणेशोत्सव साध्या प्रकारे करायचा असला तरी कोरोनामुळे मंडळांचे बजेटही कोलमडले आहे. त्यामुळे या मंडळांना मदत म्हणून मूर्तीदान करण्याचा निर्णय घेतला, असे दहीसरच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सांगितले.
आपल्या विभागातील सर्वच मंडळे मोठी नाहीत, मोठ्या मंडळांकडे मागीलवर्षीची शिल्लक असते. मात्र छोट्या मंडळांना दरवर्षी नवी सुरुवात करावा लागते, त्यांना मदत केली जाईल. या मंडळांना मूर्त्या तसेच दहा दिवसांचे पूजेचे साहित्य उदा. उदबत्या, तेल, फुले, प्रसाद, फळे, श्रीफत आदी दिले जाईल. अर्थात शासन निर्णयानुसार या मूर्ती फक्त दोन फुटांच्याच
असतील व त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या नसतील. या पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती पेणहून आणल्या जातील व त्यामुळे वादळाने तडाखा दिलेल्या या मूर्तीकारांनाही दिलासा मिळेल, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी मंडळांना नेहमीसारख्या देणग्याही मिळणे कठीण झाले आहे. सरकारच्या निर्देशांनुसार आगमन किंवा विसर्जन सोहळा न करता साधेपणाने उत्सव करायचा आहे. आरोग्यविषयक नियमही पाळायचे आहेत. त्यामुळे मंडळांना आम्ही देणगीस्वरुपात मूर्ती देऊ, मंडळांना आठवड्याभरात आधी मूर्ती निवडाव्या लागतील. मात्र मंडळांनी उत्सव नियमानुसार करणे अपेक्षित आहे. मूर्तीविसर्जनही समुद्रात किंवा खाड्यांमध्ये न करता शक्यतो कृत्रिम तलावातच करायचे आहे. त्यासाठी आपण कृत्रिम तलावांचीही सोय करू, असे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.