मुंबई : तीनशे लोकसंख्येचा निकष पूर्ण न केल्याने गावाच्या महसूली दर्जापासून वंचित राहिलेल्या, राज्यातील बंजारा तांड्याबाबत वेगळे धोरण करता येईल का?, यासाठी विशेष बैठक घेणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.
बंजारा तांड्याला गावाचा महसुली दर्जा देण्याच्या राजेश राठोड यांच्या प्रश्नाच्या उत्तरात थोरात यांनी ही माहिती दिली. तीनशे लोकसंख्या असेल, तर गावाचा दर्जा देतो, या राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांच्या उत्तराने समाधान न झालेले सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कॅबिनेटमंत्र्यांना उत्तर देण्यास सांगितले. त्यावर थोरात यांनी बैठक घेऊन वेगळे धोरण करता येईल का हे पाहू, असे सांगितले. एक वर्षापूर्वी मंत्र्यांनी हेच उत्तर दिले होते, असे यावर निलय नाईक म्हणाले.
तत्पूर्वी औरंगाबाद वा परभणी जिल्ह्यापुरता हा प्रश्न मर्यादित नसून तो राज्यभर असल्याने त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणार का अशी विचारणा सुरेश धस यांनी केली होती. तसेच लोकसंख्येची अट दोनशे करण्याची मागणीही त्यांनी केली. तर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असा दर्जा न मिळालेल्या तांड्यांना विशेष निधी दिला होता असे सांगत तो देणार का अशी विचारणा केली. त्यावर बोलावलेल्या बैठकीत निर्णय घेऊ असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोकणातील सत्तर-ऐंशी एवढीच लोकसंख्या असलेले धनगरवाडेही लोकसंख्येचा हा निकष पूर्ण करू शकत नसल्याने डोंगरी भागासाठी सरकारने दिलेला निधी परत गेला आहे, याकडे रामदास कदम यांनी लक्ष वेधले.
केंद्राच्या पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी अडकलेल्या हर्णे बंदरातील जेटी उभारणीचे भुमीपूजन यावर्षी करू, असे ठाम आश्वासन मत्योद्योगमंत्री अस्लम शेख यांनी दिले. मनिषा कायंदे यांनी हा प्रश्न विचारला होता. फसवणुकीच्या गुन्ह्यात अर्नाळा पोलिस ठाण्यावरील फौजदाराने हलगर्जीपणा केल्याचे दिसून आल्यास त्याच्यााविरुद्ध कारवाई करू,असे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
तसेच हा तपास आता त्यांच्याकडून काढून वरिष्ठ पोलिस निरीक्षकाकडे देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या गुन्ह्यात एका आरोपीला अटक झाली असून दुसरी आरोपी महिला गरोदर असल्याने ही कारवाई केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आरोपींची मालमत्ता गोठवून त्यातून गुंतवणुकादारांचे पैसे दिले जातील, असे मंत्र्यांनी सांगितले. कृषीमंत्री दादा भूसे तसेच राज्यमंत्रीही न आल्याने त्यांच्या खात्याशी सबंधित दोन प्रश्न सभापतींनी उद्यापर्यंत राखून ठेवले.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.