शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजाने पीककर्ज 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प आज सादर केला.
 Ajit Pawar .jpg
Ajit Pawar .jpg

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प आज सादर केला. त्यावेळी कोरोना काळात राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली. असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला असल्याचे पवारांनी सांगितले.

कोरोनामुळे सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी असताना राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली. या काळात राज्यातील कृषी आणि सलग्न क्षेत्रात 11.7 टक्के इतकी वाढ पहायला मिळाली आहे. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे पवारांनी सांगितले.

तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्याची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला असून 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना १९ हजार कोटी कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

एपीएमसीच्या बळकटीसाठी 2 हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. त्याच बरोबर पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी 3700 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अमरावतीच्या मोर्शीमध्ये संत्रा प्रकल्पाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

अहिल्याबाई होळकरांच्या नावावर तालुकास्तरावर रोपवाटीका केंद्र सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात एकूण 26 सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, तर 12 धरणाच्या बळकटीसाठी 624 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पनाच्या विक्रीसाठी सुरु करण्यात आलेल्या 'विकेल ते पिकेल' या योजनेसाठी 2 हजार 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

शेतमालाचा व्यवहार अधिक पारदर्शक व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगत पवारांनी सांगितले. कृषी पंपाच्या सौर उर्जा जोडणीसाठी महावितरणाला 1500 कोटी देण्यात येणार आहेत. पक्का गोठा बांधण्यासाठीही राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यात आता पुणे व सातारा जिल्हा बॅंकेचा पॅटर्न 

राज्यात पीक कर्जाचा व्याजदर हा द. सा. द. से. (दर साल, दर शेकडा) सात टक्के इतका आहे. मात्र यापैकी केंद्र सरकार तीन टक्के व्याज सवलत परतावा देत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना हे कर्ज चार टक्के व्याजाने पडत आहे. याला पुणे व सातारा या दोन जिल्हा बॅंकांचा मागील सुमारे दीड दशकांपासून अपवाद आहे. या दोन्ही जिल्हा बॅंका या साधारणतः मागील पंधरा वर्षापासूनच तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने वाटप करत आहेत. हाच उपक्रम आता राज्यभरात राबवला जाणार आहे.  

राज्यातील पीक कर्ज वाटप स्थिती

राज्यातील एकूण शेतकरी १ कोटी ५३ लाख, कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी ३१ लाख २३ हजार
शेतकऱ्यांना चालू वर्षात १९ हजार कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप केले आहे, राज्यातील जिल्हा बॅंकांची संख्या ३४ आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com