मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे संकेत दिले होते. तर काल रात्री उशिरा राष्ट्रवादीने देशमुखांना क्लिन चीट दिल्याचे समजते. आज शरद पवार व मुख्यमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी चार वाजता महत्वाची बैठक बोलवल्याचेही समजते.
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला आहे. या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप व मनसेने देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, हा आरोप राष्ट्रवादीने फार गंभीरतेने घेतला नसून देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपने जरी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी फडणवीस यांच्याच काळात त्यांनी अनेक मंत्र्यांना क्लिन चिट दिली होती, अशी आठवण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निमित्ताने काल करून दिली.
परमीबीरसिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय गदारोळ सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी काल उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांची अडीच तास बैठक झाली. त्या बैठकीनंतर बोलताना जयंत पाटलांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली. परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपांवर ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या निःस्पृह अधिकाऱ्याची किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार इतर अधिकाऱ्यांची चौकशीसाठी समिती नेमण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. परमबीरसिंग यांचे आरोप हे त्यांचे पद काढून घेतल्यानंतरचे आहेत, असाही दावा पाटील यांनी केला.
या बैठकीपूर्वी काही तास आधी पवार यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज पवार व ठाकरे यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि देशमुखांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होईल, असे समजते. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, काल दिवसभर भाजपने देशमुखांच्या राजीनाम्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढला. प्रसाद लाड, चित्रा वाघ अटक यांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली. देशमुख यांचा राजीनामा घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा भाजपने दिला आहे.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.