मुंबई : खासदार संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे वक्तव्य केलं होतं. आज त्यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा त्याच्या पुनर्रच्चार केला. तसेच बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवीन राजकीय पक्षाचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळं पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन पक्ष येणार, या चर्चेला उधाण आले आहे. (If the people want a new political party will be considered says SambhajiRaje)
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला असून अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यानंतर त्यांनी काल राष्ट्रवादी कॅांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तर आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आदींना भेटले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.
संभाजीराजे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटण्याची वेळ दिलेली नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अनेकदा वेळ मागितली आहे, असे संभाजीराजे यांनीच सांगितले आहे. तर भाजपच्या काही नेत्यांनी कोरोनाचे कारण पुढे केले आहे. तसेच हा राज्याचा विषय असल्याने वेळ दिली नाही, असा दावाही काहींनी केला. त्यामुळं संभाजीराजे भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. आज त्यांनी नवीन पक्षाबाबत भूमिका स्पष्ट करून या चर्चेत भर टाकली आहे.
आंदोलनावरून भाजपला टोला
आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन करण्याची भूमिका काही नेत्यांनी मांडली आहे. भाजपने या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण संभाजीराजे यांनी त्यावरून नाराजी व्यक्त केली. कोरोनाची साथ अजून संपलेली नाही. तिसरी लाटही येऊ शकते. आधी जगू आणि नंतर लढू. त्यामुळं आंदोलनांमध्ये लोकांना वेठीस धरू नका. तुमच्याकडे काय पर्याय आहेत ते सांगा. सगळ्यांनी एकत्रित येऊन चर्चा करा, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.
मराठा आरक्षणासाठी तीन पर्याय
मराठा आरक्षणांसदर्भात समाजातील अनेकांशी बोललो आहे. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारसमोर तीन पर्याय ठेवले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ते पर्याच मान्य केले आहेत. आता कोण नाही म्हणतंय ते बघतो. ते बदलले तर त्याला जबाबदार तेच असतील, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सत्ताधारी व विरोधकांना दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे म्हणाले, सत्ताधारी व विरोधकांचे वागणे पाहून अस्वस्थ झालो होतो. पण समाजातील सर्वांनी एकत्रित येत महाराष्ट्राचा दौरा करण्याचे ठरवले. मराठा आरक्षणासाठी काहीतरी पर्याय द्यायलाच हवा. सर्वांनी एकत्रित येऊन तीन पर्याय काढले आहेत. यावर मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण यांनीही हे पर्याय मान्य केले आहेत. मराठा आरक्षण ही केवळ राज्य सरकारची जबाबदारी नाही तर केंद्र सरकारही सोबत हवे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर कुटूंबासारखे वागावे लागेल, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
संभाजीराजेंनी दिलेले तीन पर्याय :
१. जस्टीस भोसलेंची समिती स्थापन केली आहे. या समितीचीम मुदत ३१ तारखेला संपत आहे. तर न्यायालयात रिव्हिव पिटीशनची मुदत वाढवली आहे. हे पिटीशन दाखल करताना गडबड करू नये. केवळ लोकांना दाखविण्यासाठी नको. हे पिटीशन फुलप्रुफ हवे.
२. रिव्हीव पिटीशनही टिकले नाही तर क्युरिटिव पिटीशन दाखल करावे. हा राज्य सरकारकडे पर्याच आहे.
३. घटनेतील कलम ३४२ अ नुसार राज्यापालांमार्फत प्रस्ताव सादर करावा लागेल. त्यासाठी राज्य शासनाला डाटा सादर करावा लागेल. गायकवाड अहवाला त्रुटी असतील तर दुरूस्त कराव्या लागतील. राज्यपालांच्या माध्यमातून राष्टपतींकडे प्रस्ताव जाईल. तिथून आवश्यक असल्यास केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जाईल. संसदेतही जाऊ शकतो.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.