मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने आज या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहेत. हा मार्ग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला होता, असा दावा विधान परिषदतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
केंद्र सरकारने आज रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातल्याची घोषणा केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन फायदेशीर ठरत असल्याने त्याची मागणी वाढली आहे. मात्र, गरज नसलेल्या रुग्णांनाही हे इंजेक्शन दिले जात असल्याचे समोर आले आहे. मागणी वाढल्याने इंजेक्शनचा काळाबाजारही सुरू झाला आहे. रुग्णांना एका इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागत आहे. पण अनेकांना इंजेक्शन मिळत नाही.
याविषयी बोलताना दरेकर म्हणाले, केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करणाऱ्यांना आता आभार मानण्याची वेळ आली आहे. फडणवीस यांनी उपाय म्हणून मार्ग सांगितला. त्यावरून केंद्राने रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर पाठविणे थांबविले आहे. राज्यातील अपयश झाकण्यासाठी केंद्राला जबाबदार धरले जात आहे. एकीकडे मदत मागायची आणि दुसरीकडे टीका करण्यापेक्षा समन्वय साधून निर्णय घ्यावा, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. रेमिडिसविर इंजेक्शनचा काळाबाजार होतोय मग व्यवस्था काय करते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राजकिय कुरघोडी करण्यासाठी वेळ न घालवता सरकारने कोरोना उपाययोजना करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे. सरकार भांबवलेल्या अवस्थेत आहे. लॅाकडाऊनबाबत अजूनही संभ्रम आहे. शवविद्युत दाहिनी वाढवण्यावर भर देण्यापेक्षा सर्व सामान्यांवर ती वेळ येता कामा नये, यासाठी प्रयत्न करावेत. भंडारा, भांडुप, दहिसर, नागपूर या ठिकाणी आगी लागल्यानंतर सरकारला जाग येते. धुळ्याला कचऱ्याच्या गाडीतून प्रेत न्यावे लागते. एका वेळी 45 जणांना अग्नी द्यावा लागतो. अनेक ठिकठिकाणी अॅाक्सीजन कमी आहे. त्यावर कुणी काही बोलत नाही. माञ राजकिय वक्तव्य करण्यात धन्यता मानली जाते, अशी टीका दरकर यांनी राज्य सरकारवर केली.
रेमडेसिविरबाबत मोठा निर्णय; केंद्र सरकारने केली घोषणा
देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णालयात दाखल होणारे रुग्णही वाढल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीही वेगाने वाढत आहे. परिणामी, देशात अनेक ठिकाणी रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. देशात या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत होण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आज या इंजेक्शनसह त्यातील घटकांची निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. देशात दर महिन्याला 38 लाख 80 हजार इंजेक्शन उत्पादित करण्याची औषध कंपन्यांची क्षमता आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर इंजेक्शन मिळेल, यादृष्टीने पावले टाकली जात असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.