मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे राज्यसरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. त्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
रविवारी (ता. ४ एप्रिल) भांडूप येथील तुळशेत पाडा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला दरेकर यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. दरेकर म्हणाले, आम्हाला राजकारण करायची इच्छा नाही. संकटकाळात एका बाजूला तुम्ही सांगता राजकारण करायचे नाही आणि 'सामना'मधून भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्षावर टीका करायची. हे पण टाळायला पाहिजे कारण संकट काळात लोकांना हे आवडत नाही. जी वस्तुस्थिती आहे, ती मान्य करा, असा सल्ला दरेकर यांनी राज्य सरकारला दिला.
लॅाकडाऊन हा काही उपाय नाही. त्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. लोकांनी स्वतःचा उदरनिर्वाह कसा करावा असा सवाल दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे सरकारने नागरिकांच्या खात्यांमध्ये पाच दहा हजार रुपये जमा करावे, अशी मागणी त्यांनी केली. यामध्ये सुवर्णमध्य काढणे गरजेचे आहे. टप्प्याटप्प्याने निर्बंध लावले गेले पाहिजेत, अशी सूचना देखील दरेकर यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहोत, विरोधीपक्ष म्हणून तुम्ही सहकार्य करा. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल कि सरकरने जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यावा. भाजप सरकारच्या पाठीशी उभा राहील, असे आश्वासन दिले, असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कोरोनाला हरविण्याचे आवाहन केले होते. मात्र, कोरोनासाठी काही उपाययोजना केल्या तर त्याचे राजकारण करू नका, असा टोला विरोधकांना लावला होता. लाॅकडाऊनची प्रत्यक्ष घोषणा त्यांनी केलीली नाही. पण तो लावण्याचा इशारा राज्याच्या जनतेला शुक्रवारी दिलेल्या संदेशात त्यांनी दिला होता. भाजपच्या नेत्यांनी लाॅकडाऊनला विरोध केला होता. त्यामुळे ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
ठाकरे म्हणाले की मार्चपासून राज्यात दुपटीने कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. रोज 45 हजार रुग्ण आढळत आहेत. आपण रोज 1 लाख 82 हजार कोरोना निदान चाचण्या करतो. ही संख्या अडीच लाखांपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट आहे. त्यातील 70 टक्के RTPCR चाचण्या असतील, याची दक्षता घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
लष्करच्या धर्तीवर मोफत हॉस्पिटल उभारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. राज्यात पावणेचार लाख खाटांची सुविधा उभारण्यात आली आहेत. मात्र याच वेगाने रुग्णवाढ झाली तर 15 ते 20 दिवसांत या साऱ्या सुविधा अपुऱ्या पडतील. कोरोना लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. एका दिवशी तीन लाख लोकांना लसीकरण करण्याची क्षमता आपण गाठली. 65 लाख नागरिकांना आतापर्यंत लसीकरण केले आहे. लशीची पुरवठा वाढला तर रोज 6 ते 7 लाख लोकांना ती देण्याची आपली क्षमता आहे. पण लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे लस घेतली तरी मास्क घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले होते.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.