मुंबई : राज्यपालांच्या भाषणावरील अभिनंदन प्रस्ताव मांडताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हवरही त्यांनी निशाणा साधला होता. 'मुख्यमंत्र्यांचं २१ फेब्रुवारीचं लाईव्ह सर्वोत्कृष्ट होतं..' असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला होता. मुख्यमंत्र्यांनीही आज फडणवीसांच्या या वक्तव्यावरून त्यांना टोला लगावला.
मागील वर्षभरापासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून जनतेशी संवाद साधण्यासाठी फेसबुक लाईव्हचा आधार घेतला जातो. या माध्यमातून ते कोरोनाविषयी सातत्याने जनतेला आवाहन करत आले आहेत. तसेच विविध महत्वाच्या घोषणाही त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केल्या आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षातील नेते मुख्यमंत्र्यांना सतत लक्ष्य करतात.
अधिवेशनाच्या दुसऱ्यादिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारने राज्यपालांना चौकातलं भाषण दिल्याची बोचरी टीका फडणवीसांनी केली होती. तसेच त्यांनी सरकार फक्त फेसबुक लाईव्ह करत असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांचं २१ फेब्रुवारीचं लाईव्ह सर्वोत्कृष्ट होते. कारण आमच्या मुख्यमंत्र्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का विचारलं… मुख्यमंत्री महोदय जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत कधीच पोहचत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला होता.
आज विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांना कोरोनाबाबत विचारले असता ते म्हणाले, ''कोरोना हा गंभीर विषय आहे. त्यावर एक दोन दिवसांत आपल्याशी बोलणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर आपल्या विरोधी पक्षनेत्यांना आवडतं ते फेसबुक लाईव्ह करेन.'' आता मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह कधी घेणार आणि त्यावर फडणवीस काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.
राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांना कोपरखळी
"नाणार प्रकल्पासंदर्भात मी फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले नाही, तर ते ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवले आहे. पत्र मिळाल्यानंतर मला शरद पवार यांचा फोन आला होता. "तुम्ही घेतलेली भूमिका ही अत्यंत योग्य भूमिका आहे. अशा प्रकारचे प्रकल्प आतातरी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नयेत,' असे तेही म्हणाले. ते स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांना नाणार प्रकल्पाबाबत बोलणार आहेत. तुम्हाला आणि मला जरी मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळाला नाही, तरी ते पवारसाहेबांना वेळ देतील. कारण, सरकार त्यांच्यावर अवलंबून आहे,'' अशा शब्दांत मंत्रालयात न झालेल्या भेटीबाबत राज यांनी मुख्यमंत्र्यांना कोपरखळी मारली.
नाणार येथील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, अशी भूमिका घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. कोकणातील नाणार समर्थकांनी सोमवारी (ता. 8 मार्च) राज यांची भेट घेत हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत राहावे, असे विनंती केली. त्या वेळी राज ठाकरे बोलत होते.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.