काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभलाय महाराष्ट्राला!

प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय?
 Atul Bhatkhalkar, Uddhav Thackeray, .jpg
Atul Bhatkhalkar, Uddhav Thackeray, .jpg

मुंबई :  मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) याचिकेवर सर्वोच्च (Supreme Court) न्यायालयाने बुधवारी महत्वाचा निकाल दिला. राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. त्यामुळे राज्य सरकार व मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा, ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली होती. त्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

भातखळकर यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. ते म्हणाले की ''यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, कळत नाही, फक्त फुकाची बडबड, तोंडाची वाफ. काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभलाय महाराष्ट्राला...प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत, कडी लावून. सर्व काही केंद्र सरकारने करावे, आम्ही फक्त घरी बसून वसूली करणार, अशा शब्दात भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
 
"राज्याच्या विधीमंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला आहे. आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगितले आहे. हे एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच झाले आहे''.

ठाकरे म्हणाले, ''महाराष्ट्र कोरोना विरुध्दची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देव म्हणायला हवे. महाराष्ट्राने मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्याच्या विधीमंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला आहे''.  

''गायकवाड समितीच्या शिफारशींबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाl ही सर्वोच्च न्यायालयाने केराची टोपली दाखवली आहे. महाराष्ट्राची विधानसभा सार्वभौम आहे व सरकार हे लोकांचा आवाज आहे. मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील मोठ्या पिडीत वर्गाचा आक्रोश असल्यामुळेच सरकारने निर्णय घेतला होता. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगितले गेले आहे. हे एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच झाले''.  

''आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. त्याआधी शहाबानो प्रकरण, ॲट्रासिटी कायद्यासंदर्भात तसेच 370 कलम काढण्यासंदर्भात केंद्राने तत्पर निर्णय घेऊन न्यायप्रियता दाखवली आहेच. यासाठी घटनेतही बदल केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी. छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत, त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही'', असा प्रश्न उद्धव ठाकरे उपस्थित केला.

''ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे, म्हणून हा प्रश्न, असून  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही. पण यानिमित्ताने कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नयेत. जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहिल'', असेही त्यांनी स्पष्ट केले होते. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com