मुंबई : कांदिवलीचे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीचा विषय पेटताच ठेवण्याचे भाजपने ठरवलेले दिसत आहे. कारण, आज (ता. 13 सप्टेंबर) पक्षाच्या दक्षिण-मध्य मुंबई विभागातर्फे दादरच्या शिवसेना भवनासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.
भाजपचे दक्षिण मध्य मुंबई विभागाचे अध्यक्ष राजेश शिरवडकर तसेच माहीम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा अक्षता तेंडुलकर, माजी अध्यक्ष विलास आंबेकर आदींसह कित्येक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
या वेळी उपस्थितांनी नौदल अधिकाऱ्यास मारहाण केल्याबद्दल शिवसेना, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. भाजपने या विषयावर शनिवारी (ता. 13 सप्टेंबर) कांदिवलीत जोरदार निदर्शने केली होती. मात्र, आजच्या निदर्शनांमुळे हा विषय पेटता ठेवण्याचे भाजपने ठरविले असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने नागरिकांनी व्यक्त केली.
परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवसेना घेते. पण, त्यांच्या ताब्यात असलेल्या महापालिकेने नुकतेच अभिनेत्री कंगना रनौट या महिलेचे घर उद्ध्वस्त केले, हीच शिवसेनेची मर्दुमकी आहे, त्यांना एवढेच येते, अशी बोचरी टीका जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी या वेळी केली.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या भयावह गतीने वाढत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेची गुंडगिरी वाढते आहे, महिला सुरक्षित नाहीत, सरकारने पोलिसांना वाऱ्यावर सोडले आहे, हेच या सरकारचे कर्तृत्व आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
हेही वाचा : काय चूक होती त्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याची? राम कदमांचा शिवसेनेला सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील पोस्ट शेअर केल्याप्रकरणी ज्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे.
कदम यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी शिवसेनेचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर या संदर्भात जोरदार टीका करतानाच हल्लेखोरांना जामीन कसा काय मिळतो असा सवाल केला होता. त्यापाठोपाठ आता कदम यांनीही शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
राम कदम यांनी म्हटले आहे, की लष्करी अधिकारी किंवा जवान स्वत:च्या जीवाची पर्वा न करता देशासाठी आपले प्राण देण्यास तयार असतात. अशा लष्करी अधिकारी जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपले हात त्यांना सलाम करतात. मात्र शिवसेनेची मंडळी देशासाठी लढलेल्यांवर हात उचलत आहेत हे कितपत योग्य आहे.
एका माजी सैनिकाला मारहाण झाली असली तरी एका सैनिकाचा नव्हे तर देशभरातील सैनिकांचा अपमान शिवसेनेने केला आहे. काय चूक होती त्या निवृत्त अधिकाऱ्याची. शिवसेनेने कितपत योग्य केले. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचेही कदम यांनी म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.