मुंबई : गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी मुंबईहून रेल्वे न सोडल्याने भारतीय जनता पक्षाचे आमदार ऍड आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर हल्लोबोल केला आहे. आता परतीच्या प्रवासासाठी तरी कोकणातील चाकरमान्यांना रेल्वे गाड्या उपलब्ध करून द्यायचे सोडून हे "पाडून दाखवा सरकारचे' मंत्री आपापसांत भांडत आहेत. हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई, अशा शब्दांत शेलार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
राज्य सरकारच्या धोरणशून्य कारभारामुळे चाकरमान्यांना गणेशोत्सवाला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध झाली नाही. यामुळे सरकारविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउननंतर अनलॉकची प्रक्रिया राबवूनही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली.
राज्य सरकारने एसटी बस सुरू केल्या तरी समन्वयाअभावी रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत. गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी तरी विशेष कोकण रेल्वे सुरू करावी, या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख राजू कांबळे आणि सुजित लोंढे यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर आमदार ऍड शेलार यांनी चाकरमान्यांसाठी रेल्वेची सोय न केल्याबद्दल ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये शेलार यांनी म्हटले आहे की, "कुठलाही ठोस निर्णय नाही, कसले नियोजन नाही, समन्वय नाही. केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वतःचे अपयश झाकण्याचे कौशल्ये राज्यातील या "पाडून दाखवा सरकारकडे' आहे. कोकणात रेल्वे गाड्या सोडण्यावरून हेच सुरु आहे. रेल्वेची तयारी असतानाही राज्य सरकारने गाड्या सोडल्या नाहीत. चाकरमान्यांना त्रास दिला.'
'आम्ही वारंवार सांगितले, रेल्वे तयार आहे; पण आमचे ऐकले नाही.. एसटी बसही वेळेत दिल्या नाहीत. अवाजवी भाडे देऊन चाकरमान्यांना जावे लागले...आता कोकणातून परतीच्या प्रवासाला तरी चाकरमान्यांसाठी रेल्वे उपलब्ध करून द्यायची सोडून मंत्री तू-तू -मै-मै करीत बसले आहेत. "पाडून दाखवा सरकारचे' हे मंत्री आहेत की, भांडखोर सासूबाई?' अशा शब्दांत ऍड आशिष शेलार यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
दरम्यान, या पूर्वी 11 ऑगस्ट रोजी ही शेलार यांनी याच मुद्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले होते. रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने कोकणातील चाकरमान्यांसाठी ही सुविधा का उपलब्ध करून दिली नाही. प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे सरकारने चाकरमान्यांचे या वेळी हाल का केले. ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर कुठला आणि कसला राग काढला आहे, असे प्रश्न त्यांनी विचारला होता.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.