मुंबई : "आत्मचिंतनाची गरज शिवसेनेला नसून भाजपलाच आहे,' अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या निकालांबाबत आज (ता. 4 डिसेंबर) परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.
"तीन चाकांच्या रिक्षाने आज बुलेट ट्रेनला हरवले,' असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. तीन पक्ष एकत्र आले, तर काय निकाल लागू शकतो, हे महाविकास आघाडीने दाखवून दिले आहे, असेही मंत्री परब म्हणाले.
अमरावती शिक्षक मतदारसंघाबाबत बोलताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, "ती जागा यापूर्वी देखील शिवसेनेची नव्हती. याअगोदर तिथे अपक्षच निवडून आले होते व आताही तिथे अपक्षच निवडून आले आहेत. ती जागा भाजपने आताही जिंकलेली नाही. याउलट भाजपने त्यांच्या परंपरागत निवडून येणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघासारख्या जागा गमावल्या आहेत. त्यामुळे त्यांनीच आत्मचिंतन करावे.'
महाविकास आघाडीबाबत प्रतिक्रिया देताना "महाराष्ट्रात यापुढे महाविकास आघाडी एकत्र लढल्यास दुसऱ्या कोणत्याच पक्षाला जागा राहणार नाही. या निवडणुकीत तीनही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढले व हे त्याचेच यश आहे. तीन पक्षांचे झेंडे जरी वेगवेगळे असले तरी अजेंडा मात्र एकच आहे. तीनही पक्षांच्या प्रमुखांनी ठरवलेल्या किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे,' असेही परब या वेळी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.