गृहमंत्री देशमुखांनी मुख्यमंत्र्यांना पाच दिवसांपूर्वी लिहिलेलं 'ते' पत्र केलं उघड...

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने काल घेतला.
Anil Deshmukh's letter to the Chief Minister revealed
Anil Deshmukh's letter to the Chief Minister revealed

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणीच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने काल घेतला. त्यामुळे आता निवृत्त न्यायमूर्तींमार्फत या प्रकरणाची चौकशी होणार आहे. पण आपल्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी  देशमुखांनी पाच दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. 

परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्यात वादळ उठले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले आहे. गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसह बदली रॅकेटच्या चौकशीची मागणी केंद्रीय गृहसचिव तसेच राज्यपालांकडेही केली आहे. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे. अखेर काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत चौकशीचा निर्णय घेण्यात आला.

देशमुख यांनी सुरूवातीपासूनच आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचेही म्हटले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना चौकशीची विनंती करणारे पत्र दिल्याचे त्यांनी काल उघड केले. न्यायालयीन चौकशीचा निर्णय झाल्यानंतर हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर टाकले. 

देशमुख यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीचे पत्र रात्री उशिरा ट्विटरवर पोस्ट केले आहे. हे पत्र त्यांनी २१ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. ''मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते...", असे देशमुख यांनी ट्विट करून म्हटलं आहे. 

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आज सुनावणी

दरम्यान, मुंबई पोलिस आयुक्तपदावरून राज्य सरकारने केलेल्या बदलीला परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच गृहमंत्री देशमुख यांनी महिन्याला शंभर कोटी रुपये हप्ता आपल्या पोलिस अधिकाऱ्यांना गोळा करण्यास सांगितला होता, त्याचीही सीबीआय मार्फत चाैकशी करण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली होती. मात्र, ती फेटाळताना मुंबईतील घटना असल्याने प्रथम तेथील उच्च न्यायालयात जाण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यावर आज सुनावणी होणार आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com