पुणे : लाखो क्रिकेट रसिकांनी ज्या मैदानावर चुरशीचे सामने पाहिले, आवडत्या खेळाडूंचा खेळ अनुभवला त्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे कोरोना क्वारंटाईन केंद्रात रुपांतर करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरुन राजकारण सुरु झाले आहे. त्यातच खेळांची मैदाने पावसाळ्याच्या काळात क्वारंटाईन केंद्रे म्हणून विकसित करणे योग्य होणार नाही, अशी माहिती पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना ट्वीटद्वारे कळवली आहे.
मुंबईची वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता वानखेडे स्टेडियमचे रुपांतर क्वारंटाईन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार सुरु आहे. त्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे स्वागत केले. वानखेडे बरोबरच 'ब्रेबाॅर्न' स्टेडियमचाही यासाठी विचार करावा, अशी सूचना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली.
त्यानंतर काही वेळातच आदित्य ठाकरे यांनी राऊत यांना उद्देशून एक ट्वीट केले. येणारा पावसाळा लक्षात घेता ज्या ठिकाणी मातीची मैदाने आहेत अशी ठिकाणे क्वारंटाईन केंद्रे म्हणून घेता येणार नाहीत. ज्या ठिकाणी पक्की किंवा काँक्रीटीकरण केलेली जमीन आहे अशी ठिकाणे यासाठी वापरता येतील व ती ठिकाणे आम्ही ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती आदित्य यांनी या ट्वीटद्वारे दिली.
दरम्यान, आता यात भाजपही उतरला आहे. भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी महापालिका आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. चर्चगेटच्या वानखेडे स्टेडियमचा परिसर हा शिस्तबद्ध व कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांचा परिसर असून या ठिकाणी कोरोना क्वारंटाईन केंद्र करण्यास या नागरिकांचा विरोध असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.