मोठी बातमी - शेतकरी मोर्चाला दोन्ही ठाकरेंची अनुपस्थिती; भाजपसाठी अनुकूल भूमिका?
मुंबई : आज मुंबईत निघणाऱ्या शेतकरी मोर्चात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे पूत्र व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे दोघेही अनुपस्थित राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. शिवसेनेची ही भूमिका भाजपला अनुकूल ठरेल की काय असे आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
शेतकरी आंदोलन आज राजभवनावर धडकणार आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे आज मुंबईच्या आझाद मैदानापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली होती. मात्र, ठाकरे अनुपस्थित राहणार असल्याचे सकाळपासून सांगण्यात येत आहे.
त्यांच्या ऐवजी आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी होतील, असेही सांगण्यात येत होते. मात्र, आदित्य ठाकरे सकाळीच ठाण्यातील पत्रीपुलाच्या उद्घाटनासाठी निघून गेले आहेत. त्यामुळे तेही या मोर्चाला उपस्थित राहणार नाहीत, असे दिसून येते आहे. या दोघांचीही अनुपस्थिती भाजपला अनुकूल ठरेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. कृषी विधेयकांना शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला होता. राज्यसभेत मात्र या विधेयकांना विरोध करण्यात आला होता. त्यामुळे शिवसेनेने भाजपला दुखावायचे नाही, असे धोरण घेतलेले दिसते, अशीही चर्चा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीतल्या एकीला विचलित करणारे हे पाऊल असेल असेही बोलले जात आहे.
दरम्यान आझाद मैदानातून तीन वाजता लॉंग मार्च सुरू होणार असून आणि तो मेट्रो जवळ अडवला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नेतृत्वाखाली शिष्टमंडळ हे राजभवनावर जाईल, असेही कळविण्यात आले आहे. मात्र, स्वतः राज्यपालच गोव्यात असल्याने ते मोर्चाचे निवेदन स्वीकारू शकणार नाहीत, असे बोलले जात आहे.
दरम्यान, दोन महिन्यापासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. नवा इतिहास घडविणारं हे आंदोलन आहे. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यासाठी आहे, असे माऩण्याचे कारण नाही. केंद्र सरकारने व्यापाऱ्यासाठी हे कायदे केले आहेत, त्यांना साठेबाजी करायची, हा सरकारचा डाव आहे, असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं शोषण करणारे कायदे केलेले आहेत. त्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. देशातील शेतकरी त्रस्त झाला आहे. नागपूर येथे काँग्रेसने मोठे आंदोलन केले. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यासाठी आहे, असे माऩण्याचे कारण नाही. केंद्र सरकारने व्यापाऱ्यासाठी हे कायदे करण्यात आले आहे. साठेबाजी करायची, हा सरकारचा डाव आहे. आतून पैसा उभा करून तो राजकारणासाठी वापरता येईल का, असा विचार ते करीत असावे, त्यांचा निषेध आम्ही करतो.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.