मुंबई : भाजप नेते व माजी खासदर किरीट सोमय्या यांनी सातत्याने चालवलेल्या आरोपांमुळे ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला अकारण तडा बसतो आहे. सोमय्या शांत होणार नाहीत हे गृहित धरत आता त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा लावण्याची चाचपणी शिवसेनेने सुरु केली आहे.
कोणतीही बेलगाम विधाने करता आहात ,ती सिध्द करा अन्यथा माफी मागा असा दावा ठोकण्याचा शिवसेना नेत्यांचा विचार आहे. मानहानीचे दावे वर्षानुवर्षे सुरु असतात ,नंतर ते विस्मृतीत जातात त्यामुळे हा कालापव्य़य टाळण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा, अशी विनंती न्यायालयाला करता येईल काय ही शक्यताही तपासून पाहिली जाते आहे.शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांनी या संदर्भात ठाकरे परिवाराशी चर्चा केली आहे.
पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात अंतिम निर्णय सांगतील अन त्यानुसार दाव्याची तयारी केली जाईल असे एका उच्चपदस्थ नेत्याने सांगितले. या संदर्भात उच्च व सर्वोच्च न्यायालयातील नामवंत वकिलांशी सल्लामसलत करण्यात येते आहे .
किरीट सोमय्या यांनी रश्मी उध्दव ठाकरे यांच्या अलिबाग येथील घराबाबत जे आरोप केले आहेत, त्यात तथ्य नाही, असे सांगण्यात येत आहे. ते आयकर विवरणासारख्या काही महत्वाच्या कागदपत्रात नमूद केले असल्याचेही सांगण्यात येते आहे.
वर्षपूर्तीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थिरस्थावर झाल्याने आता प्रतिमासंवर्धनाकडे लक्ष देण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. थेट उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबियांवर दररोज होणारे आरोप जनतेच्या मनात किंतू निर्माण करतात, असे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख सहकार्यांनी त्यांना सांगितले. ग्रामपंचायत निवडणुका सुरु आहेत अन महापालिका निवडणुका येवू घातल्या असल्याने आता भाजपला अपप्रचाराची संधी मिळू देता कामा नये असे एका मंत्र्याने सांगितले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.