मुंबई : सुपारी घेतल्याशिवाय मनसे कोणतेही काम करत नाही. त्यांचे अस्तित्व त्यावरच आहे, अशा शब्दांत परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी मनसेवर टीका केली. मनसेने वाढीव वीजबिलाविरोधात छेडलेल्या आंदोलनावरून अॅड. परब यांनी हा हल्ला चढवला आहे.परब यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपचाही समाचार घेतला.
सरकार जाईल ही स्वप्न बघतच भाजपला पाच वर्षे काढायची आहेत. त्यानंतरही त्यांचा स्वप्नभंग होणार आहे. सत्तेविना ते अस्वस्थ झाले आहेत. कार्यकर्ते बिथरू नये म्हणून त्यांना हे बोलावे लागते, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही समाचार त्यांनी घेतला. "शरद पवार कोठे, त्यांचे कर्तृत्व कुठे आणि पडळकर कोठे? कोणावरही टीका करताना स्वत:कडे पाहावे. वयाच्या ३६ व्या वर्षी पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. हे असे बोलणारे भाजपच्या संस्कारातले नाहीत, ही भेसळ आहे. ओरिजनल भाजपमधील असे बोलणार नाहीत,"असा टोलाही त्यांनी लगावला.
कठोर निर्णय घ्यावे लागतील!
पुन्हा लॉकडाऊन करावे या मताचे सरकार नाही; पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असेल तर सरकारलाही काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. रुग्णसंख्या कमी असली तरी कोव्हिडचे रुग्णालय बंद न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दळणवळण साधनांवर निर्बंध घालण्याबाबत पुढच्या पंधरवड्यात आकडेवारी पाहून निर्णय घेण्यात येईल, असेही अॅड. परब यांनी सांगितले..
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.