मुंबई : उद्धव ठाकरे यांना आपण मुख्यमंत्री पदासाठई शब्द दिला नव्हता, असे अमित शहा म्हणतात. त्यांच्या मते हा चुनावी जुमला होता. १३० कोटी जनतेला अमित शहा फसवू शकतात, तर त्यांनी उद्धव ठाकरेंना फसविणे यात आश्चर्य काही नाही, असा टोमणा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मारला आहे.
राज्यात निवडणुकीत शिवसेनेसोबत युती असताना उध्दव ठाकरे हे निवडणूक प्रचाराच्या बॅनरवर नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो लावून प्रचार करीत होते. मुख्यमंत्रीपदावर मी कुठलीही चर्चा केली नव्हती. मी कधीही बंद खोलीत राजकारण केले नाही. पण सत्तेसाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना मूठमाती दिली. स्वार्थासाठी ते सत्तेत आले आहेत, असे अमित शहा काल सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले असता म्हणाले होते. त्यावर सावंत यांनी वरीलप्रमाणे टोमणा मारला आहे.
सावंत पुढे म्हणाले, "आमचं सरकार तीन चाकी रिक्षा आहे हे आम्ही पहिल्यापासून मानतो. तीन चाकी रिक्षा हे गरिबांचे वाहन आहे. अंबानी अदानींचे सरकार बनन्यापेक्षा गरिबांचा सरकार कधीही परवडेल. भाजप या तीन चाकी रिक्षाच्या पुढे अनेक खड्डे खोदत आहे. भाजप पक्षाचे सहकार क्षेत्रामध्ये काय काम आहे हे आश्चर्यजनक आहे. सहकार हे काँग्रेस ने उभारलं. फडणवीस सरकारच्या काळात या सहकारी संस्थांना कशा प्रकारे त्रास दिला हे आपण पाहिले आहे. अनेक कायदे कसे बदलले हेही पाहिलं. याबाबत सौ चुहे खाके बिल्ली हज को चली गयी असे म्हणावे लागेल,''
निर्मला सीतारामण काल मुंबईत होत्या. त्यांच्या कालच्या वक्तव्यांबद्दल बोलताना सावंत म्हणाला, "देश विकायला काढल्याचा हा प्रकार आहे. कर्तव्य शून्य पिढी आपल्या बाप दाज्यांची कमाई विकण्याचे काम करत असते तसे मोदी सरकार करत आहे. निवडक उद्योजकांच्या फायद्यासाठी हा अर्थसंकल्प मांडला गेला. निर्मला सीतारमण खोटं बोलतात. पेट्रोल वरती एक्साईज ड्युटी मुळे २० लाख कोटींपेक्षा जास्त निधी मोदी सरकारने गोळा केला आहे. आपकी बार सौ पार अशी परिस्थिती आहे. गेल्या सहा वर्षापासून ही लूट सुरू आहे. हा खोटारडेपणाचा कळस आहे,"
Edited By - Amit Golwalkar

