जिल्हा परिषदेतच्या ओबीसींच्या जागा कमी होऊ देणार नाही : प्रकाश शेंडगे

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबद्दलचा सुप्रिम कोर्टाचा निकाल हा ओबीसींचं राजकीय आयुष्य उध्वस्त करणारा आहे. कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या जागा कमी होऊ देणार नाही. येत्या सोमवारी मुंबईत ओबीसींची राज्यव्यापी बैठक बोलावणार असून या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
Prakash Shendge
Prakash Shendge

मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबद्दलचा सुप्रिम कोर्टाचा निकाल हा ओबीसींचं राजकीय आयुष्य उध्वस्त करणारा आहे. कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या जागा कमी होऊ देणार नाही. येत्या सोमवारी मुंबईत ओबीसींची राज्यव्यापी बैठक बोलावणार असून या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

ओबीसी समाजासाठी असलेल्या २७ टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेतील जागा निश्चित करून निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. याचा थेट परिणाम नागपूरसह अकोला, वाशीम, नंदूरबार व धुळे जिल्हा परिषदांवर होण्याची शक्यता आहे. लगेच न्यायालयाच्या आदेशाची पालन करण्याची वेळ आल्यास पुन्हा निवडणुकासुद्धा घ्याव्या लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खानविलकर, इंदू मल्होत्रा व अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिल्याची माहिती ॲड. मुकेश समर्थ यांनी दिली. न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारने ओबीसींच्या लोकसंख्येच्या आधारे जागा निश्चित करण्याचा अध्यादेश काढला होता. त्यानुसार जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. परंतु ओबीसींच्या लोकसंख्येचा आकडा नसल्याने जागा निश्चित करता येणार नसल्याचे शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने निकालाच्या अधीन राहून निवडणूक घेण्यास परवानगी दिली होती. पाचही जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. त्यात सुमारे ओबीसींसाठी ५० टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. आता त्यात २७ टक्क्यांपर्यंत कपात करावी लागणार आहे.

दरम्यान, धुळे जिल्हा परिषदेच्या १५ गटांतील निवडणुका नव्याने घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ४) दिले. निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक ७३ टक्के आरक्षण झाले होते. याबाबत बोरकुंडचे प्रकाश पाटील यांनी याचिका दाखल केली होती. तिचा निकाल गुरुवारी लागला.

वर्षभरापूर्वीच निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचे या निकालामुळे धाबे दणाणले आहे. विशेष करून भाजपचे बहुमत असलेल्या जिल्हा परिषदेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. दोन आठवड्यांच्या आत निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीमुळे वातावरण ढवळून निघणार आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com