मुंबई : राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असते. चीनचे राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा, असा सणसणीत चिमटा माजी खासदार निलेश राणे यांनी काढला आहे.
आमचे सरकार केंद्रात असते तर आम्ही चीनच्या सैन्याला १५ मिनिटांत आमच्या भूभागावरुन बाहेर काढले असते असे वक्तव्य काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी कुरुक्षेत्र येथे काल केले होते. चीन प्रश्न हाताळण्यात अपयश आल्याबद्दल राहुल यांनी मोदी सरकारवर या भाषणात टीका केली होती. त्यावर निलेश राणे यांनी हा चिमटा काढला आहे. ''राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए. के. अँटनी रक्षामंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती. पण ए.के. अँटनीनी हसत उत्तर दिले होते की, आमच्या चर्चा सुरू आहेत, चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार??, असेही निलेश राणे यांनी ट्वीट करुन म्हटले आहे.
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'मातोश्री' वरुन कारभार चालवत असल्याबद्दल त्यांच्या विरोधकांनी त्यांना लक्ष्य बनवले आहे. हाच संदर्भ घेत निलेश राणेंनी हे ट्वीट केले आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्याची टिंगल उडवली आहे, "आमचं सरकार असतं तर चीनी सैन्याला 15 मिनिटात बाहेर काढलं असतं' असे राहुल गांधी म्हणतात. पण 'दोन आण्याची भांग घेतली तर कितीही भारी कल्पना सुचू शकतात', असे लोकमान्य टिळक एका अग्रलेखात म्हणाले होते. नेहरूंपासून चीन कडून मार खाण्याचा इतिहास असताना राहुलना असे सुचते, त्याचे उत्तर टिळकांनी दिलेले आहे,'' अशी खरपूस टीका भातखळकर यांनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.