काॅंग्रेसच्या विरोधामुळे अजितदादांच्या मनासारखा निर्णय़ होईना!

महापालिका निवडणुका वेळेवर होण्याची चिन्हे..
Ajit Pawar-Nana Patole
Ajit Pawar-Nana Patole

मुंबई : राज्यातील महापालिकांच्या निवडणुका (Corporation Elections 2022) या एक की दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने घ्यावयाच्या यावर महाविकास आघाडी (Mahvikas Aghadi) कोणत्याही निर्णयावर आलेली नाही. राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीयनुसार प्रभागरचना करण्याचे आदेश देऊन कामही सुरू केले तरी त्यावर राज्य सरकारच्या तीन घटक पक्षांत प्रभागरचनेवर अद्याप मतैक्य झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दोन सदस्यीय प्रभागरचनेसाठी आग्रही असताना दुसरीकडे काॅंग्रेस (Congress) मात्र एक सदस्यीय प्रभागासाठी अनुकूल आहे. या दोन प्रमुख पक्षांतील मतभेदांमुळेच प्रभागरचनेसाठीचा निर्णय अद्याप मंत्रीमंडळ बैठकीत होऊ शकलेला नाही. 

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर निवडणुका पुढे जाण्यचाा अंदाज सर्वच राजकीय पक्ष व्यक्त करत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सहा जिल्हा परिषदांतील पोटनिवडणुका घेण्यास संमती दिली आहे. तसेच या निवडणुका घेण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाचा असल्याचे सांगत सरकारचा निवडणूक वेळापत्रकातील हस्तक्षेपही रोखला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुका या पुढे जातील, असे गृहित धरूनच राजकीय पक्ष नियोजन करत होते. त्यामुळे प्रभागरचनेसाठीचा कायदा बदलण्यासाठी महाविकास आघाडी सरकार फार घाईत नव्हते. आता मात्र निवडणुका वेळेवर होण्याची चिन्हे असल्याने प्रभागरचनेसाठीचा कायदा बदलणे आवश्यक झाले आहे. मात्र तेथेच मतभेदाची माशी शिंकली आहे.  

पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आणि सोलापूर या महापालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत असेल, असे ठाकरे सरकारमधील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. यात राष्ट्रवादीचा सर्वाधिक आग्रह आहे. दुसरीकडे शिवसेनेला मुंबई, बई, आणि औरंगाबाद या ठिकाणी शिवसेनेला एकसदस्यीय प्रभाग पद्धत हवी आहे. काॅंग्रेस सर्वत्र महापालिकांत एकसदस्यीय प्रभागपद्धती असावी, असे वाटते आहे. 

राज्य सरकारच्या डिसेंबर २०२० च्या कायद्यात या निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धत असल्याने निवडणूक आयोगाने त्यानुसार पावले टाकली आहेत. ही प्रक्रिया सुरू केली असली तरी प्रभाग पद्धती ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारचा असल्याचे सांगत एकसदस्यीय प्रभाग रचना अंतिम नसल्याचे संकेत सत्ताधारी नेतेमंडळी देत आहेत.

हा नवा निर्णय घेण्यासाठी  तिन्ही पक्ष एकत्र घेतील आणि त्यानंतर प्रभाग पध्दतीचे स्वरुप ठरविण्याबाबत मैत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानंतर मात्र घटक पक्षांत एकमत नसल्याने प्रभाग पद्धतीबाबत नेत्यांची बैठकही झाली नाही. त्यामुळे यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याचा प्रसंगही आलेला नाही.  महापालिकांची मुदत संपण्यास पाच-साडेपाच महिनेच राहिल्याने प्रभाग पध्दतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु, सरकारच्या पातळीवर प्रभाग पध्दतीबाबत अंतिम भूमिका ठरलेली नसल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com