मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बदलल्यानंतर आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पद एकाच व्यक्तीकडे नको, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीला आता जोर आला आहे. बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीत महसूलमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमावा, अशी मागणी येत आहे. थोरात यांच्या जागी राजीव सातव, विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले किंवा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांवाची चर्चा आहे.
मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांची काही दिवसांपूर्वी निवड करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचा नारा जगताप यांनी दिला आहे. दुसरीकडे राज्यातल्या महाविकास आघाडीचा भाग असलेली काँग्रेस नाराज आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला गृहित धरले जात असल्याची चर्चा अधूनमधून या पक्षाचे नेते करतात. शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली गेली होती. त्यावरुनही काँग्रेसमध्ये नाराजी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसची भूमीका अधिक आक्रमकपणे मांडली जावी, अशी नेत्यांची इच्छा आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.