मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीबाबत सर्वच राजकीय पक्ष विविध दावे करत असताना प्रदेश युवक काँग्रेसनेही यात उडी घेतली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत युवक काँग्रेसचे ५०० पेक्षा जास्त पदाधिकारी निवडून आले असल्याचा दावा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केला आहे. आमचे जे पदाधिकारी निवडून आलेले आहेत त्यांच्यावरच आम्ही दावा करत असल्याने तो महत्त्वाचा आहे, असं तांबे यांनी स्पष्ट केलंय. रियालिटी चेक केली तर भाजप राज्यात चार नंबरचा पक्ष असल्याचा दावाही तांबे यांनी केला.
राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला आहे. राज्याच्या सर्व भागातील ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडीने ८० टक्के जागा मिळवून प्रचंड मोठा विजय मिळविला आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
थोरात म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकांच्या या निकालातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामावर जनतेने विश्वास दाखवल्याचे समोर आले आहे. राज्यात भाजपचा दारूण पराभव झाला असून, भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव मान्य करावा. कोल्हापूर, नंदूरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, उस्मानाबाद, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांत आतापर्यंतच्या निकालावरून काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर आला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे जनतेने या निवडणुकीतही भाजपचा दारूण पराभव करत महाराष्ट्र विकास आघाडीला कौल दिला आहे. जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास दाखविला आहे. विदर्भात काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले असून, 50 टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसचा विजय झाला आहे. विदर्भातील जनतेने काँग्रेसच्या पारड्यात निर्विवाद यश टाकले आहे. मराठवाड्यात काँग्रेसच्या जागा आणि मतांचाही टक्का वाढला, येथेही काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर येईल, असेही थोरात म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.