मुंबई महाराष्ट्रात सुरू असलेले मेळावे आणि लग्नसमारंभांतील गर्दी हाताबाहेर जात असल्याने लवकरच दररोज कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या १० हजारांच्या आसपास पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. संभाव्य रुग्णवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या काही भागांत अंशत: लॉकडाऊन करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नसल्याचे मत सरकारमधील काही उच्चपदस्थ व्यक्त करीत आहेत.
गर्दीला सावरण्यासाठी लागू केलेले नियम प्रत्यक्षात आणले जात नसतील, तर रात्रीची संचारबंदी किंवा काही बाधित जिल्ह्यांमध्ये प्रवेशबंदीसारखे निर्णय प्रत्यक्षात आणावे लागतील काय, याची चर्चा सुरू झाली आहे. गेले ४२ दिवस नियंत्रणात असलेली करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेणे आणि प्राणवायूच्या बेगमीकडे लक्ष देण्याचे काम सुरू झाले आहे.
रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवता आली नाही, तर प्रकोप होईल काय, अशा भीतीने नागरिकांना पछाडले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या तज्ज्ञांशी संपर्क साधला आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील खबरदारी घेतली जाईल. आरोग्य खात्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल हे लक्षात घेत तयारी चालवली असतानाच संसर्गाचे प्रमाण मोठे असले तरी विषाणू जीवघेणा नाही, असा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे.
मुंबईसह राज्यभर गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण राज्य कोव्हिड टास्क फोर्स समितीनेही मांडले आहे. मुंबईत शनिवारी 897 नवे रुग्ण सापडले. राज्यात दिवसभरात 6,281 नव्या रुग्णांचे निदान झाल्याने लॉकडाऊनच्या चर्चेला ऊत आला आहे; मात्र आठवडाभराच्या निरीक्षणानंतर लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे समितीने म्हटले आहे, परंतु रुग्णवाढीची भीती असल्याने सावधगिरीची गरज व्यक्त करीत आताच कडक प्रतिबंध घालणे गरजेचे आहे, असे मतही टास्क फोर्स समितीने मांडले आहे.
दरम्यान, संभाव्य रुग्णवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या काही भागांत अंशत: लॉकडाऊन करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नसल्याचे मत सरकारमधील काही उच्चपदस्थही व्यक्त करत आहेत. रात्रीची संचारबंदी किंवा काही बाधित जिल्ह्यांमध्ये प्रवेशबंदीसारखे निर्णय प्रत्यक्षात आणण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. शनिवारी दिवसभर राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेला ऊत आला होता. धास्तावलेल्या नागरिकांनी इतरांना फोन करून त्याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. गंभीर वातावरण पसरले असताना त्याबाबत कोरोना मृत्यू निरीक्षण समिती सदस्यांना विचारले असता, सध्या आठवडाभर कोरोनाच्या नोंदीचे निरीक्षण करण्यात येईल आणि त्यानंतर लॉकडाऊनचा विचार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.