मुंबई : मुख्यमंत्री अबोल असले तरी चतुर आहेत, त्यांनी तीन पक्षांचे सरकार यशस्वीपणे चालवले आहे. हे सरकार पाच वर्ष जनतेसाठी काम करत राहील, हा मला विश्वास आहे, अशी प्रशंसा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना केली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र थांबला नाही. महाराष्ट्र थांबणार नाही.' या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना पवार म्हणाले, "या सोहळ्यास उपस्थित राहताना विशेष आनंद होत आहे. अनेक संकटांमधून मार्ग काढत हा जगन्नाथाचा रथ यशस्वीपणे पुढे घेऊन जाण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे. शेती आणि शेतकरी संकटात होता, कोरोनाशी लढा सुरू आहे. पण मागील ५० वर्षांमध्ये मी असे कधी पाहिले नाही की, एक वर्ष पूर्ण होताच सरकारच्या कामगिरीची चिकित्सा सुरू झाली. कधी नव्हे ती मिळालेली सत्ता हातातून गेल्यामुळे काही लोक सतत शंका उपस्थित करण्याची भूमिका घेत आहेत. पण सरकारमधील प्रत्येक प्रतिनिधीने आपल्यावरील जबाबदारी चोख पार पाडली आहे. त्यामुळे संकटग्रस्तांना देखील सरकारबाबत विश्वास वाटतो,''
''गेल्या ८-१० दिवसांपासून पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी रस्त्यावर उपोषणासाठी बसला आहे. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून न घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आहे. पण मागील एक वर्षात राज्यातील बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही, हे या सरकारचे विशेष यश मानावे लागेल. महाराष्ट्र हे उद्योगधंदे असलेले महत्त्वाचे राज्य आहे. राज्याची गती थांबली तर देशाचे अर्थचक्र थांबू शकते. त्यामुळे कारखान्यांचे चक्र कसे सुरू राहील, लोकांच्या हातातले काम जाणार नाही, याकडे राज्य सरकारने विशेष लक्ष दिले. त्यामुळे राज्यातील कारखानदारी आणि उद्योगधंदे बंद पडले नाहीत,'' असेही पवार यांनी नमूद केले.
''कोरोनाच्या या कठीण काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व केल्यामुळेच हे शक्य झाले. लोकांनीही संकट निवारणात सरकारला साथ दिली, त्यामुळेच हा जगन्नाथाचा रथ पुढे गेला. या सरकारमध्ये अनेक सहकारी असे आहेत ज्यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रदीर्घ प्रशासनाचा अनुभव असलेले सहकारीही आहेत. एका बाजुने नवी उमेद तर दुसऱ्या बाजूने प्रदीर्घ अनुभव याचा सुरेख संगम असल्यामुळे हे सरकार यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सरकार चालवत असताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. मुख्यमंत्री अबोल असले तरी चतुर आहेत, त्यांनी तीन पक्षांचे सरकार यशस्वीपणे चालवले आहे. हे सरकार पाच वर्ष जनतेसाठी काम करत राहील, हा मला विश्वास आहे,'' असेही पवार म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.