It is likely to rain in some districts of Maharashtra due to the cyclone
It is likely to rain in some districts of Maharashtra due to the cyclone

महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांवर यास चक्रीवादळाचे ढग; काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा

ओडिशाच्या किनारपट्टीवर बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास यास यक्रीवादळाने धडक दिली.

मुंबई : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या यास (Yaas Cyclone) चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लाखो लोकांना याचा फटका बसला असून अनेक गावे जलमय झाली होती. आता हे वादळ झारखंड राज्यावर घोंघावत असून त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (It is likely to rain in some districts of Maharashtra due to the cyclone)

ओडिशाच्या किनारपट्टीवर बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास यास यक्रीवादळाने धडक दिली. यावेळी ताशी 155 ते 165 किमी वेगाने वारे वाहत होते. तसेच मुसळधार पाऊस कोसळल्याने किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये 24 तासांत 200 मिमीहून अधिक पाऊस कोसळला. बंगालमध्येही अनेक जिल्ह्यांत हीच स्थिती होती. त्यातच समुद्राचे पाणीही अनेक गावांमध्ये घुसले. त्यामुळं ही गावं जलमय झाली होती. 

वादळची तीव्रता कमी झाली असली तरी अजूनही झारखंड, बिहार, छत्तीसगढ या राज्यांत ते सक्रीय आहे. सध्या झारखंडमध्ये वादळाचा केंद्रबिंदु असल्याने अनेक भागात जोराचे वारे वाहत असून मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांवरही वादळाचे सावट आहे. पुढील तीन दिवस पूर्व विदर्भातील काही भाग, कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर तसेच अकोला, जालना, लातूर, नांदेड, अमरावती या जिल्ह्यांतील तुरळक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात वादळी वारे वाहतील, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेले तोक्ते चक्रीवादळ पूर्णपणे ओसरले आहे. मागील वर्षीही राज्याला निसर्ग वादळाचा तडाखा बसला होता. मागील काही वर्षांत अरबी समुद्रात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळे येत आहेत. हा परिणाम हवामान बदलाचा असल्याचे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

1990 पासून अरबी समुद्रांत तयार होणाऱ्या वादळांच्या ट्रेंड वाढला आहे. एका अभ्यासानुसार हवामान बदलामुळे वादळांची तीव्रता वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण यावरील पुरेसा अभ्यास व विश्लेषण नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com