मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या आणखी एका पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.29) एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना रूग्णांना घरी सोडण्याचा आणि एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यूसंख्या आढळून येण्याकडेही लक्ष वेधले आहे. आकडेवारीपेक्षा कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली आहे.
या पत्रात ते म्हणतात की, चार एप्रिलपासून 28 मे पर्यंतच्या आकडेवारीचे अवलोकन केले असता सरासरी 344 कोरोना रुग्ण एका दिवशी रुग्णालयातून घरी परतत आहेत. या 54 दिवसांत 18,564 रुग्ण घरी परतले आहेत. मात्र शुक्रवारी (ता. 29) एकाच दिवशी 8 हजार 381 रूग्णांना घरी सोडण्यात आल्याची बाब राज्य सरकारच्या शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलेली आहे. त्यातील 6 हजार 191 एकट्या मुंबईतील असल्याचे मुंबई महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे निदर्शनास येते. असाच प्रकार मृत्यूच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याच्या बाबतीत आहे.
वरील कालखंडातील आतापर्यंतच्या दिवसांची मृत्यूची सरासरी काढली तर ती 36 च्या आसपास येते. परंतु गेल्या 4 दिवसांपासून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या शंभरीच्या घरात गेली आहे. ता. 26 मे रोजी 97, 27 मे रोजी 105 आणि 29 मे रोजी तब्बल 116 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
ऐकीकडे रुग्णांना घरी सोडणाऱ्यांच्या संख्येत वाढ आणि दुसरीकडे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतसुद्धा वाढ, ही बाब चिंताजनक आहे. योग्य काळजी न घेण्याच्या अनेक घटना निदर्शनास येत आहेत.
वांद्रे पोलिस ठाण्यातील हवालदार दीपक हाटे यांना दहा दिवस शासकीय केंद्रात उपचार दिल्यानंतर घरी सोडण्यात आले होते. पण, घरी परतल्यावर अवघ्या काही क्षणात त्यांची प्रकृती अवस्थ झाली. रुग्णवाहिका मिळण्यासाठी त्यांनी दोन तास संघर्ष केला. पण, त्यांना कोणतीही रुग्णवाहिका मिळू शकली नाही आणि परिणामी अवघ्या चार तासातच त्यांचा मृत्यू झाला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.