मुंबई : धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांकडून दुरध्वनी क्रमांकच बदलण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांनी केला आहे. रामिष्टे यांना पुन्हा एकदा धमकी देणारे पत्र आले आहे. मात्र, अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करण्यापलिकडे पोलिसांकडून गांभीर्याने तपास होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अविनाश रामिष्टे सध्या अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस म्हणून मागील काही वर्षे काम पहात आहेत. ही जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत. चार वर्षांपूर्वी पेण येथे त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला होता. या घटनेतील गुन्हेगारांचा अद्याप तपास लागलेला नाही. रामिष्टे कार्यालयात जानेवारी 2018 मध्ये दूरध्वनीवरून संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली होती.
तर जून महिन्यात आलेल्या धमकीच्या पत्राला थेट बंदुकीची गोळी चिकटविण्यात आली होती. याबाबत अनेकदा पोलिसांत तक्रार करूनही गांभीर्याने शोध घेतला जात नाही. उलट नंतर त्यांचे पोलिस संरक्षण काढण्यात आले. मागीलवर्षी जानेवारीमध्ये त्यांना पुन्हा धमकीचा दूरध्वनी आला.
याबाबत पोलिसांकडे गेल्यानंतर दुरध्वनी क्रमांक बदला, काळजी घ्या, तपास सुरू आहे असे सल्ले दिले जात आहेत. धमक्यांबाबत केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. काही कमीजास्त झाल्यानंतरच पोलिस दखल घेणार का, असा सवाल रामिष्टे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.