वाशिम : राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शिथील करण्यात आलेली बंधनेच आता कोरोना वाढण्यास कारणीभूत ठरू लागल्याचे चित्र आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालये, वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. त्याचा फटका विद्यार्थी व शिक्षकांना बसू लागला आहे. जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका निवासी शाळेतील तब्बल 229 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यासाठी राज्य शासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. पुण्यासह सातारा, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागल्याने अधिक दक्षता घेतली जात आहे. त्यात राज्याची चिंता वाढविणारी बातमी आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील देगाव येथील एका निवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी कऱण्यात आली. त्यामध्ये दोन दिवसांतच 229 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तसेच शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही बाधित झाले आहेत. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निवासी शाळेला भेट दिली आहे. शाळेचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
बाधित विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक 151 विद्यार्थी असल्याचे समजते. तसेच यवतमाळमधील 55, वाशिममधील 11, बुलडाणामधील 3, हिंगोलीतील 8 आणि अकोलामधील एकाचा समावेश आहे. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी केली जाणार आहे. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे पथक या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.