नागपूर ः राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना बहुतेक विस्मरणाचा रोग झाला आहे. कारण, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. तसेच लॉकडाउन केल्यानंतर देशभरातील नागरिकांना धान्य तसेच रोख रक्कम दिली होती, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड यांना लगावला.
जगभरातील विविध देशांतील केंद्रीय सरकारनी तेथील जनतेला लॉकडाउन केल्यानंतर पॅकेज जाहीर केले होते. आता केंद्र सरकारही तसे पॅकेज जाहीर करणार का, असा प्रश्न फडणवीस यांना नागपूरच्या विमानतळावर विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी वरील उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले की, लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सरकारने कुठलीच मदत केली नाही. केंद्र सरकारने वीस लाख कोटींचे पॅकेज दिले होते. देशातील इतर राज्यांनी पॅकेज दिली होती. महाराष्ट्र सरकारने मात्र लोकांना त्रास दिला. राज्यात शेतकरी, नागरिकांची वीज कनेक्शन कापली. कोरोना काळात लोकांना त्रास देणारे महाराष्ट्र हे देशभरातील एकमेव राज्य आहे. राज्यातील जनतेशी बोलताना शुक्रवारी (ता. २ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगभरातील किती देशांनी लॉकडाउन लावला आहे, याची माहिती दिली. पण, तत्पूर्वी त्यांनी कोणकेणत्याही उपाय योजना केल्या होत्या, याचीही माहिती द्यायला हवी होती.
राज्यात कोरोना का वाढतो आहे, त्यावर कोणकोणत्या उपाय योजना राबविण्यात येत आहेत. पेशंटची संख्या वाढल्यावर बेडस मिळत नाही, त्याबाबतची सोय कशी करण्यात येणार आहे, हे सांगायला हवे होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सल्ला देणाऱ्यांनाच उत्तरे दिली. विरोधकांना टोले लगावण्यात आले, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
कोरोना रुग्णांची संख्या राज्यात कशामुळे वाढते आहे. रुग्णसंख्या वाढली तर आपल्याकडील आरोग्य व्यवस्था त्याला तोंड देण्यासाठी पुरेशा आहे का, याबाबत कालच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलायला हवे होते. त्यांनी विरोधकांना टोले मात्र लगावले.
लॉकडाउन लावण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा अल्मिमेटम दिला आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मग मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण कशासाठी होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार करूनच लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. लॉकडाउन केल्यानंतर देशभरातील नागरिकांना रोख रक्कम व धान्य वितरण केले होते. तसा कार्यकम राबवा आणि मगच लॉकडाउनचा विचार करावा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.