महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी, सत्यशोधक चळवळीतील झुंजार नेतृत्व डॉ. बाबासाहेब पांडुरंग तथा बाबा आढाव उद्या (ता. 1 जून) वयाची नव्वद वर्षे पूर्ण करत आहेत. बाबांचा वाढदिवस हा महाराष्ट्राच्या पुरोगामी, प्रगतशील विचारांच्या चळवळीचा वाढदिवस आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांवरील निष्ठेचा हा वाढदिवस आहे.
"एक गाव-एक पाणवठा' आंदोलनाच्या माध्यमातून संघर्षव्रती डॉ. बाबा आढाव यांनी सामाजिक समतेची चळवळ गावागावांत पोचवली. समाजातील वंचित, उपेक्षित, दुर्बल, कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी ते जीवनभर लढत आले. त्या योद्धाचा हा वाढदिवस आहे. राजकारणात, समाजकारणात काम करत असताना व्यापक लोकहितासाठी नेमके काय केले पाहिजे, हे सांगणाऱ्या दीपस्तंभाचा हा वाढदिवस आहे. बाबांच्या परिवर्तनवादी चळवळीचा एक हितचिंतक या नात्याने त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना करतो. समाजातील कष्टकरी बांधवांच्या लढ्याला बाबांचे नेतृत्व दीर्घ काळ मिळत राहावे, अशा सदिच्छा व्यक्त करतो.
बाबांचं कार्य आणि कार्यकर्ते महाराष्ट्रभर असले तरी बाबांचं पुण्याशी एक वेगळं नातं आहे. याच नात्यातून माझी बाबांशी अनेकदा भेट, संपर्क, संवाद होतो. त्या प्रत्येक भेटीत बाबांकडून सोनचाफ्याचं फूल आवर्जून मिळतं. त्यांच्याकडून मिळणारं सोनचाफ्याचं फूल हे त्यांच्यातल्या चांगुलपणाची, ममत्वाची, आपुलकीची प्रचिती देऊन जातं. त्या सोनचाफ्याचा दरवळ आणि बाबांचं स्थान माझ्या मनात कायम राहणार आहे.
बाबांचं संपूर्ण जीवन हे उच्च कोटीच्या नैतिक मूल्यांनी भरलेलं आहे. खरंतर बाबा हे आयुर्वेदाचे डॉक्टर. राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात ते वाढले. सुरुवातीच्या काळातच समाजवादी विचारांशी जुळलेली नाळ वयाच्या नव्वदीतही तितकीच घट्ट आहे, यातून त्यांची वैचारिक बांधिलकी व सामाजिक निष्ठा अधोरेखित होते.
कष्टकरी बांधवांच्या, वंचित समाजघटकांना हक्क मिळवून देण्यासाठी बाबांनी अनेक आंदोलनं केली. अर्धशतकाहून अधिक वेळा तुरुंगवास भोगला. त्यातून अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली. बाबांच्या आंदोलनांइतकंच त्यांचं सामाजिक कार्यही मोठं आहे. हमाल पंचायतीच्या माध्यमातून बाबांनी उभं केलेलं काम हे त्यांच्या संघटन कौशल्याचं, कष्टकरी बांधवांबद्दलच्या तळमळीचं प्रतिक आहे. आज दररोज पंधरा हजारांहून अधिक श्रमिकांना "कष्टाची भाकर' मिळते, ती केवळ बाबांमुळेच, असं मला वाटतं. असंघटीत कामगारांना संरक्षण देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे, याचंही मोठं श्रेय बाबांनी केलेल्या पाठपुराव्याला आहे, हे मान्य करावं लागेल.
पुण्यासह अनेक शहरांच्या झोपडपट्टीत राहणारे गरीब नागरिक, हमाल व कष्टकरी बांधव, घरकाम करणारा भगिनी, रिक्षाचालक अशा अनेकांसाठी बाबांनी आपलं आयुष्य वाहिलं आहे. आज बाबा खऱ्या अर्थाने या कष्टकऱ्यांचे "बाबा' आहेत. ते केवळ पुणेकरांचे नाहीत, तर अखिल महाराष्ट्राचे "बाबा' बनले आहेत.
सामाजिक सुधारणांचे अग्रणी महात्मा जोतिराव फुले यांचे पुण्यातील निवासस्थान फुलेवाड्याचं राज्य संरक्षित स्मारक व्हावं, यासाठी बाबांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकालात हा प्रश्न सुटला. बाबांच्या आंदोलनाची आणि सामाजिक कार्याची यादी खूप मोठी आहे. "एक गाव एक पाणवठा', हमाल माथाडी कायदा, पथारी व्यावसायिकांसाठीचे धोरण, रिक्षा पंचायतीद्वारे रिक्षाचालकांच्या प्रश्नांची झालेली सोडवणूक असे अनेक प्रश्न बाबांच्या आंदोलनांमुळे मार्गी लागले, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं.
बाबांनी अल्पकाळ राजकारण आणि आयुष्यभर समाजकारण केलं. त्यांनी 1962 ते 1971 या काळात पुणे महापालिकेचे सदस्य म्हणून काम केले. नागरी आघाडीतर्फे त्यांनी नाना पेठेचे प्रतिनिधीत्व केले होते. दोन्ही वेळी ते याच वार्डातून निवडून गेले. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य, कॉंग्रेसचे नेते शिवाजीराव ढेरे, नामदेवराव काची, नामदेवराव मते अशा अनेक मान्यवर आणि मातब्बर नेत्यांच्या सोबत त्यांनी काम केले आहे. या सर्वांचा प्रभाव त्यांच्यावर कायम राहिला आणि त्यांच्या कामातून समाजाच्या उपयोगी आला.
सामाजिक, कामगार चळवळीत काम केल्यानंतर कार्यकर्त्यांना राजकारणात येण्याचे वेध लागतात. परंतु बाबांचा प्रवास उलटा झाला. समाजातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांच्या हक्कासाठी, असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबांनी राजकारण सोडून पूर्णवेळ चळवळीला वाहून घेतलं. ठरवून असा उलटा प्रवास करणारं बाबांसारखं एखादंच व्यक्तिमत्वं असू शकतं. महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी, सत्यशोधक चळवळीच्या विचारांनी भारावलेले, राष्ट्रसेवा दल व समाजवादी विचारांच्या संस्कारात वाढलेले बाबा आढाव म्हणजे महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्याचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक आहेत. आपल्या सर्वांच्या मनात त्यांचं स्थान निश्चितच वरचं आहे.
समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी बाबा आढाव यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.