कोल्हापूर : गुप्तचर विभागाचा गोपनीय अहवाल कोणी फोडला? तो कशा पद्धतीने बाहेर गेला, हे चौकशीअंती कळेलच. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सुस्पष्टता आणली पाहिजे. सत्ता कोणाची आहे, यापेक्षा महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी तो अहवाल बाहेर कोणी दिला, हे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले पाहिजे.
फडणवीस हे गेली 20 वर्षे राज्याच्या राजकारणात आमदार म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दलची विश्वासर्हता टिकवायची असेल, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले पाहिजे की मला या संबंधित व्यक्तीने अहवाल दिला आहे. शेवटी कोणीतरी त्याची जबाबदारी घ्यावी लागेल आणि तेच याविषयी स्वतःहून सांगतील, अशी अपेक्षा आहे, अशा शब्दांत राज्याचे गृहराज्यमंती सतेज पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अहवाल फुटीचे खापर फोडले.
अहवाल बाहेर येणे गुन्हा आहे, तसेच तो फोडणेही गुन्हा आहे. फडणवीसांनी अहवाल फोडला असेल, तर त्यांनी देखील गुन्हा केला आहे का? या प्रश्नावर सतेज पाटील यांनी वरील उत्तर दिले. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शुक्रवारी (ता. 26 मार्च) पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले की, गुप्तचार विभागाचा फोन टॅपिंगचा अहवाल विरोधी पक्षनेते प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवतात, हे वाईट आहे. कारण, राज्याच्या हिताच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे घातक आहे. विरोधी पक्षनेते हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी हे करायला नको होते. त्याच्या हातात काही कागदपत्रे लागली असली तरी त्यांनी म्हणायलं हवं होतं की काही कागदपत्रे माझ्या हाती लागली असून ती मी सरकारला देणार आहे. पण ती प्रेसमध्ये देणे अत्यंत चुकीचे आहे. आज ज्या अधिकाऱ्यांची नावे त्या अहवालात आहेत, त्यांच्याबाबत भविष्यात अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षाला कागदपत्रे पुरविणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? या प्रश्नावर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल. कारण, हा कागद बाहेर कसा आला. कशा पद्धतीने तो बाहेर आला, कोणी दिला. हे राज्याच्या हिताच्या दृष्टीने पुढे आणावेच लागेल. सत्ता कोणाचीही असली तरी राज्याची प्रतिमा राखण्यासाठी हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून याची चौकशी निश्चितपणे करण्यात येणार आहे.
देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्वतः सांगितले आहे की, मी चौकशीला तयार आहे. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांच्यावर झालेल्या आरोपांची त्रयस्थ कमिटी नेमून चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्यावेळी देशमुख स्वतःच चौकशीची मागणी करत आहेत, त्यातून त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध होत आहे, असेही सतेज पाटील म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.