आमदार वैभव नाईकांनी जलजीवनच्या आराखड्याचे श्रेय लाटू नये

या त्यांच्या केविलवाण्या प्रयत्नाचा आणि वागण्याचा निषेध करतो.
MLA Vaibhav Naik should not take credit for the plan of Jaljivan Yojana
MLA Vaibhav Naik should not take credit for the plan of Jaljivan Yojana

सिंधुदुर्गनगरी : जलजीवन मिशनच्या आराखड्याला मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला आहे आणि त्यांनी त्याला मंजुरीही दिली आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या प्रयत्नातून आराखडा तयार झाला आणि त्याला मंजुरी लवकरच घेणार, अशी पत्रकबाजी करून फुकटचे श्रेय लाटू नये. मेहनत घेऊन आराखडे तयार करणाऱ्या ग्रामसमित्यांचा अवमान करू नये, असा सल्ला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व गटनेते रणजित देसाई यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी करण्यासाठी 207 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये जिल्ह्यातील 2241 वाड्यांचा समावेश आहे. हा आराखडा आपल्या प्रयत्नातूनच झाला असे भासविण्यासाठी आणि जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी आमदार नाईक पत्रकबाजी करत आहेत. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत व गटनेते देसाई यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी जिल्हा परिषद सभापती अंकुश जाधव, शर्वरी गावकर, महेंद्र चव्हाण, संतोष साटविलकर, रेश्‍मा सावंत आदी उपस्थित होते.

या वेळी देसाई म्हणाले, 15 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेतला. याला 8 जुलै 2020 मध्ये राज्य सरकारने मान्यता देऊन ही योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जलजीवन मिशन राबवण्यासाठी ग्रामस्तरावर सर्वे करून आराखडे तयार करण्यात आले. ही योजना राबवण्यासाठी एकूण चार समित्या कार्यरत आहेत. यातील जिल्हास्तरीय समिती ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समिती आहे. या समितीला आराखडा मंजूर करण्याचे अधिकार आहेत. त्यानंतर मंजूर आराखड्याला पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती शिफारस देऊन राज्य सरकारला आराखडा सादर करते. असे असताना आमदार नाईक हे आपणच प्रयत्न करून आराखडा तयार केला आणि त्याला लवकर मंजुरी घेणार, अशी पत्रकबाजी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. या त्यांच्या केविलवाण्या प्रयत्नाचा आणि वागण्याचा निषेध करतो.''
 
आराखडा बनविणाऱ्यांचा अवमान करू नका

आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामसमित्यांनी अथक प्रयत्न केले. अधिकाऱ्यांनी सर्वे करून आराखडे तयार केले. हे आराखडे एकत्रित करून छननीनंतर जिल्हास्तरीय समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आले. केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परीषद यंत्रणा प्रयत्नशील आहे. असे असताना आमदार नाईक यांनी स्वतः सर्व काही केले असे भासवून आराखडा बनविणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अवमान करू नये. त्यांनी सबुरीने वागावे व स्वतःच्या प्रयत्नतून एक तरी चांगली योजना जिल्ह्यासाठी आणावी, असा सल्ला जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत व देसाई यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com