मुंबई : "शिवसेनेचे बिनकामाचे नेते रामदास कदम यांची अवस्था एवढी वाईट झाली आहे की, त्यांचे एका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकसुद्धा ऐकत नाहीत. पोलिस निरीक्षकांनी एका स्पर्धेला परवानगी दिली; म्हणून रामदास कदमांनी विधान परिषद सभागृहात तक्रार केली...जसे की कोकणाचे बाकी सगळे विषय संपले,'' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.
कोरोनाची साथ असतानाही रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी क्रिकेट स्पर्धेला परवानगी दिली, तसेच त्या स्पर्धेला त्यांनी हजेरी लावली. त्या अधिकाऱ्याला शिवसेनेचे मंत्री पाठीशी घालत आहेत, अशी तक्रार आमदार रामदास कदम यांनी मंगळवारी (ता. 3 मार्च) विधान परिषदेत केली होती.
त्याचा नीलेश राणे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. कोकणाचे सगळे विषय संपले आहेत, त्यामुळेच कदम हे असे विषय सभागृहात मांडत आहेत, असा चिमटाही राणे यांनी कदमांना घेतला.
हेही वाचा : रामदास कदम फार दिवसांनी बोलले...पण शिवसेनेच्या मंत्र्याला फटकारले!
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम हे सध्या शांत आहेत. शिवसेनेवर भाजपकडून एवढे हल्ले होत असताना ते फारसे प्रत्युत्तर देताना माध्यमांमधून दिसत नाहीत. आज विधान परिषदेत मात्र शिवसेनेच्याच मंत्र्याला त्यांनी लक्ष्य केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत लावलेली उपस्थिती व तेथे कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन रामदासभाईंनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून मिळवले. मात्र त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे असलेले गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केले.
कदम यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याविषयी देशमुख यांच्याकडे सभागृहात तक्रार केली. कोरोनाच्या काळात क्रिकेट सामन्यांसाठी परवानगी देणे आणि सरकारी अधिकारी असताना राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेनेचेच मंत्री पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप कदम यांनी सभागृहात केला. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री असूनही तेही या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत. तुमच्यावर कोणाचा दबाव नसेल तर या अधिकाऱ्यावर कारवाई करा, असे आव्हान त्यांनी देशमुख यांना दिले होते. त्या आव्हानावर भाष्य न करता देशमुख यांनी चौकशीची आश्वासन दिले.
गृहमंत्र्यांचे हे पण आश्वासन
वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व कोरोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यात ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.