मुंबई : टीकटाॅक पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांनी राज्य मंत्री मंडळ बैठकी पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मागीतली होती... पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही भेट नाकारली आहे. त्यामुळे वन मंत्री संजय राठोड यांना आता राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झालंय. पुढील काही तासातच वन मंत्री संजय राठोड त्यांचा वन मंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता.
दुपारी 2. 30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ राठोड यांनी मागितली होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ते वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे जाणार आहेत. पोहरादेवी या ठिकाणी राठोड आपल्या मंत्री पदाचा सोबतच आमदार पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे.
पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सूई वळली आहे. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रान उठवले आहे. त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विधीमंडळाचे अधिवेशन (सोमवार ता. १ मार्च) पासून सुरु होत असल्यामुळे सरकारला कोंडीत पकडणार असल्याचे विरोधकांनी सांगितले आहे. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी सात वाजता राठोड यांना 'वर्षा' बंगल्यावर बोलावून घेण्यात आले होते. तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून उभे झालेले वादळ आणि कडक लॉकडाऊनच्या काळात पोहरादेवी मंदिरात केलेली गर्दी लक्षात घेता आता पायउतार व्हा, असे त्यांना सांगण्यात आले आहे.
दरम्यान, टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात ज्यांच्यावर संशय घेतला जात आहे ते वन राज्यमंत्री संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा अटळ असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटवरुन दिसून येते आहे. सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन....असे सूचक ट्वीट राऊत यांनी केले आहे.
राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मानणारा एक गट खुद्द शिवसेनेतही आहे. राठोड यांनी गेले काही दिवस सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटायचा प्रयत्न केला होता. पण, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या भेटीशिवाय उध्दव ठाकरे यांनी त्यांना भेटीची वेळ दिली नव्हती. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोप तसेच कोविडकाळात त्यांनी केलेले नियमांचे उल्लंघन या अत्यंत अयोग्य बाबी असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झाले असल्याचे विश्वसनीयरित्या समजते.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.