मुंबई : उच्च न्यायालयाच्या सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनामा देण्यास त्यांनी फार उशिरा केला आहे. या संपूर्ण प्रकरणात केवळ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर राज्यातील घडामोडींची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी केली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्यात सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव पुढे येणे. त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याचे नाव आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या हफ्ते वसुलीचा केलेला आरोप हा राज्याच्या गृहविभागालाच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रतिमेवर कलंक लावणारा होता. तेव्हाच गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या सर्व आरोपांची सीबीआय चौकशी लावल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यायला फार उशीर केला आहे. उशिरा का होईना राजीनामा दिला, हे स्वागतार्ह आहे. मात्र, विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते, हेच यातून निष्पन्न होत आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. कोरोनाची स्थिती भयानक वाढली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकार कमी पडले आहे.
महाराष्ट्राच्या गृह विभागाची अवस्था वाईट आहे. राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था पाहता आम्ही या आधी मागणी केली होती की, महाराष्ट्र सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, ही आमची मागणी योग्य आहे. राज्यात बिघडलेली परिस्थिती पाहता आणि गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपांची सीबीआय चौकशी सुरू झाल्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.