मुंबई : बॅंकांचे कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय माल्या याला भारताच्या हवाली करण्यात आले असून, तो मुंबईत कुठल्याही क्षणी दाखल होईल, अशा स्वरूपाचे काही वृत्तवाहिन्यांनी बुधवारी दिलेले वृत्त खोटे ठरले आहे. प्रत्यक्षात विजय माल्याला इतक्यात भारतात आणणे शक्य नसल्याचा खुलासा संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे.
माल्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अजून सुरू असल्याने त्याला भारतात आणण्यास अजून काही काळ जावा लागेल, अशी माहिती लंडन येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. मला काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया माल्याच्या सहायकाने दिली. तर याबाबत केवळ माध्यमांनाच विचारा असे विजय माल्याचे वकील आनंद दुबे यांनी सांगितले.
वृत्तवाहिन्यांनी माल्याच्या प्रत्यार्पणाबाबत जे वृत्त दिले, ते सीबीआयच्या जुन्या विधानावर आधारित असल्याचे लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने सांगितले आहे. माल्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचा खुलासा या अधिकाऱ्यांनी केला आहे.
इंग्लंडच्या गृहसचिव प्रीती पटेल यांनी अजून माल्याच्या प्रत्यार्पणसंदर्भातील फाईलवर स्वाक्षरी केलेली नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. माल्याविरुद्धचे काही खटले अद्याप ब्रिटनमध्ये प्रलंबित असून माल्या शरण येण्याबाबतही अर्ज करू शकतो, असेही सूत्रांनी सांगितले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.