नाशिक : ''राज्य सरकारकडून रुग्णांच्या अधिकृत संख्येबाबत आकड्यांची लपवाछपवी सुरू आहे,'' असा घणाघाती आरोप राज्याचे माजी जलसंपदामंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत केला. राज्य सरकारला कोरोनाचा प्रचार व प्रसार रोखणे सहज शक्य होते, परंतु नियोजनच नसल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे सर्वांचे स्वॅब घेण्याची यंत्रणाच अस्तित्वात नसल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षीची कामगिरी, केंद्र सरकार कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करत करत असलेल्या उपाययोजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची अंमलबजावणी व केंद्राने अनेक दशकांच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेले निर्णय यांची माहिती देण्यासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. परराज्यातील मजुरांची पाठवणी, मोदींनी जाहिर केलेले लॉकडाऊन, पंतप्रधान मोदी तसेच अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या निर्णयामुळे भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा महाजन यांनी यावेळी केला.
जळगावसारख्या शहरात रोज बारा ते पंधरा लोक कोरोनामुळे मृत्युमूखी पडत आहेत, कारण स्वॅबचा रिपोर्ट येण्यास पंधरा दिवस लागत आहेत, असे महाजन यावेळी म्हणाले. नियोजन नसल्यामुळेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने या साथीचा प्रभावीपणे मुकाबला असे सांगून महाजन म्हणाले, "पंतप्रधानांच्या आवाहनाला देशवासियांनी प्रतिसाद दिल्यामुळेच हे शक्य झाले आहे. केंद्राच्या आरोग्यसेतू अॅपमधूनही मोठा फायदा झाला.'' मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात अपयश आल्यामुळेच मुंबईत करोनाचे रुग्ण वाढले, असेही ते म्हणाले.
कोणाला काम करू देणार नाही अन् स्वतःही करणार नाही, असे सद्या राज्य सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने प्रभावीपणे काम केले असते तर कोरोनाला आळा घालणे सहन शक्य होते, परंतु नियोजनाचा अभाव असल्यामुळे मुंबई व राज्याच्या अनेक भागात कोरोना रुग्ण असे महाजन यावेळी म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार ऍड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी आदी यावेळी उपस्थित होते.
► अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्राने जाहिर केले १ लाख ७० हजार कोटी रूपयांचे पॅकेज.
►विविध राज्यातून तब्बल ५२ लाख मजुरांची रेल्वेद्वारे त्यांच्या राज्यात पाठवणी केली
►देशातील ४२ कोटी गरजुंना ५३ लाख २५८ कोटी रुपयांची मदत करण्यात आली
► शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवले, मोफत धान्य वाटप केले
► गरीब कुटुंबांना मोफत गॅस जोडण्या दिल्या
► जनधन खाते असणाऱ्यांच्या खात्यात थेट मदत पाठवली
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.