कोल्हापूर : राज्यात सर्कस आहे आणि त्यात प्राणीही आहेत असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यात सर्कस चालू असल्याचे मान्य केले आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात केली.
श्री. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील विविध भागात सॅनिटायझर स्टॅंडसह इतर वस्तुंचे वाटप त्यांच्याच हस्ते झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दोन दिवसांपुर्वी केंद्रीय राजनाथसिंह यांनी राज्य सरकारवर आरोप करताना राज्यात सर्कस चालू असल्याची टीका केली होती. त्याला श्री. पवार यांनी काल कोकणच्या दौऱ्यात प्रत्युत्तर देताना श्री. पवार यांनी "आमच्याकडे सर्कस आहे, त्यात प्राणी आहेत पण विदूषक नाहीत'' अशी बोचरी टिका केली होती. या दोघांच्या वादात आता श्री. पाटील यांनी उडी घेताना श्री. पवार यांच्यावर टीका केली आहे.
आपल्याला श्री. पवार यांच्याविषयी आदर असून अनेकदा दिल्लीत जाऊन त्यांचे मी मार्गदर्शन घेतल्याचेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापेक्षा श्री. पवार यांच्याविषयी मला जास्त आदर आहे, असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले. श्री. पाटील म्हणाले, "श्री. पवार हे मोठे आहेत, त्यांच्यावर वारंवार टिपण करतो याचा अर्थ मी त्यांचा अनादर करतो असा होतो. पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधीही अनादर नाही तर आदरच आहे. कोकणात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी सर्वप्रथम विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर गेल, त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि लगेच श्री. पवार हेही दौऱ्यावर आले. आम्ही गेल्यावर मात्र टिका झाली.''
श्री. पाटील म्हणाले,"केंद्रीयमंत्री राजनाथसिंह यांनी बोलल्यानंतर श्री. पवार विदूषक म्हटले, प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. पण एवढे तरी बरे की श्री. पवार यांनी त्यांच्याकडे सर्कस आहे एवढे तरी मान्य केले आणि जे कोणी त्यात आहेत ते प्राणी आहेत हेही मान्य केले. यावर लगेच श्री. आव्हाड काही तरी बोलतील पण सर्कस आहे हे मी म्हटलेलो नाही तर श्री. पवार यांनीच ते मान्य केले आहे. श्री. पवार यांच्याविषयी माझ्या मनात जेवढा आदर आहे तेवढा श्री. आव्हाड यांच्या मनात आहे का नाही हे मला माहित नाही.''
"गेल्या पाच वर्षात श्री. पवार यांची अनेकदा दिल्लीत भेट घेतली आहे. श्री. पवार यांचे साखर उद्योग, शेतीबद्दलचे ज्ञान याविषयी कोणाच्या मनात शंका नाही. शेवटी राजकारणात एकाने एक बॉल मारला तर दुसरा दुसरा बॉल मारतो असे होते. पण ते दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासारखे नसते. राजनाथसिंह यांनी एका अर्थाने तीन पक्षाचे सरकार जे चालले आहे असे म्हटले, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यातून त्यांनी यावर सर्कस अशी टिका केली आहे,'' असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.