नाशिक : गेल्या केवळ दोन ते तीन दिवसांमध्ये त्यामध्ये दोनशे ते तीनशेने वाढ झाली. आज आकडा दिड हजारांवर पोहोचलेला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमांवर एक व्हीडीओ व्हायरल केला आहे. ते म्हणाले, ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये करोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा साधारण सप्टेंबरमध्ये अकरा हजारांच्या जवळपास होता. तो आकडा 1 हजारपर्यंत पर्यंत खाली आला असताना अचानक ही स्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढ अशीच होत राहिली तर मागील वर्षाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. गेल्या वर्षी 28 मार्चला आपल्याकडे कोरोनाचा फक्त एक रुग्ण होता. त्यावेळी संपूर्ण लॉकडाऊन होते. आज आपल्याकडे पंधराशे रुग्ण आहेत. अशा वेळेला आपण पंधराशे पट काळजी घ्यायला हवी.
मास्क लावा लॉकडाऊन टाळा
जिल्हाधिकारी म्हणाले, गेल्या वर्षभरापासून आपण सर्व कोरोनाशी लढा देत आहोत. गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये आपल्याला थोडी आशा निर्माण झाली होती. आपण या संकटातून लवकरच बाहेर पडू. परंतु आज परिस्थिती बदलत आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये संसर्गामध्ये खूप लक्षणीय वाढ होताना दिसून येते आहे. त्यामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर हा सुरक्षा कवच म्हणून केला पाहिजे. याबरोबर सुरक्षित अंतर व सॅनिटायर्झचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
थेट सहभाग टाळा
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सामाजिक कार्यक्रमात थेट सहभागी होण्यापेक्षा सोशल मिडीयाद्वारे संबंधित कार्यक्रमांचा आनंद घ्यावा. असे केल्याने कोरोनाचा संसर्ग तर रोखता येईलच याशिवाय आपण आपली सामाजिक जबाबदारीही पार पाडू शकतो. तसेच जेथे आपली उपस्थिती अनिवार्य असेलच अशा ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही , जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.
...

