अकोला : बिहारच्या निवडणुकीत डेमाॅक्रेटिक फ्रंटने मते खाल्ली असा काँग्रेसचा आरोप असेल तर आधी त्यांनी स्वतःचे चारित्र्य पहावे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. १९९० मध्ये मिलीजुली सरकारची जी पद्धत आली ती पुन्हा सुरु होते आहे, असाही दावा त्यांनी केला.
बिहार निवडणुकीत भाजप - जेडीयूच्या एनडीएला मोठे यश मिळाले आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. याबाबत आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "एमआयएम- डेमाॅक्रेटिक फ्रंट ने मते खाल्ली असे काँग्रेसचे म्हणणे असेल तर मते खाण्याची ही बाब राष्ट्रीय जनता दलालाही लागू होते. त्यांना लागू होत नसेल तर मग इतरांबाबत काँग्रेसने बोलू नये. गेल्या सभागृहात काँग्रेसचे ३३ सदस्य होते. आता ही संख्या २० वर आली आहे. त्यामुळे काँग्रेसने आपले चारित्र्य पहावे,"
आंबेडकर पुढे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू आणि इमेज चालली नाही, हे बिहारच्या निवडणुकीवरुन दिसते आहे. अन्य राज्यांत या आधी जे यश मिळाले ते बिहारच्या निवडणुकीत झालेले नाही. चिराग पासवान यांच्यामुळे जेडीयूला किती परिणाम झाला हे मतांची आकडेवारी आल्यावर बोलता येईल. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक याचिकांच्या सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायालय नेमण्यास सांगितले आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांनी आपल्यावरच्या गुन्ह्यांबाबतची प्रतिज्ञापत्रे सादर केलेली नाही. त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का हा प्रश्न आहे,"
पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्येही डेमाॅक्रेटिक फ्रंटचा प्रयोग करणार का या प्रश्नावर ते म्हणाले की, प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागेल. बिहारमध्ये डेमाॅक्रेटिक फ्रंटला मते मिळाली पण यश मिळाले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.