मुंबई : राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. मे महिन्यात राज्यातील 1 कोटी 52 लाख 52 हजार 4 शिधापत्रिकाधारकांना 74 लाख 84 हजार 10 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच 33 लाख 84 हजार 40 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून मे मध्ये सुमारे 20 लाख 68 हजार 596 क्विंटल गहू, 15 लाख 88 हजार 972 क्विंटल तांदूळ, तर 22 हजार 10 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 4 लाख 43 हजार 624 शिधापत्रिकाधारकांनी माहे मे मध्ये ते जेथे राहत आहे, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 1 ते 31 मे पर्यंत या योजनेतून 1 कोटी 34 लाख 69 हजार 22 रेशनकार्डवर मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 6 कोटी 6 लाख 70 हजार 512 लोकसंख्येला 30 लाख 33 हजार 530 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.
राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून मे मध्ये 7 लाख 92 हजार 910 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत एप्रिल ते जुन दरम्यान प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत तूर किंवा चणा डाळ देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे 84 हजार 188 क्विंटल डाळीचे वाटप केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येत आहे.
राज्यात मे महिन्यात 838 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 33 लाख 84 हजार 40 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.