जुन्नर : केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत भीमाशंकर औषधी वनस्पती लागवड आणि प्रक्रिया क्लस्टर उभारण्यासाठी शंभर कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केंद्र व राज्य सरकार तसेच आयुष मंत्रालयाकडे केली आहे.
आढळराव पाटील म्हणाले, "टाळेबंदीमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेले आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती बोर्डाअंतर्गत देशात मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती लागवड आणि प्रक्रिया क्लस्टर उभारण्याचे जाहीर केले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघातील आंबेगाव, जुन्नर व खेड हे त तालुके दुर्गम आणि आदिवासी बहुल आहेत.
या परिसरात भिमाशंकर (ता. आंबेगाव) अभयारण्य असून, वनऔषधीवर आदिवासी समाजाचा चरितार्थ आहे. मात्र, वनक्षेत्र घटत असल्याने आदिवासी समाज रोजगारासाठी स्थलांतरित होत आहे. औषधी वनस्पतींच्या औषधोपचाराचे ज्ञानाचे आणि कौशल्याचे संवर्धन, जतन होणे गरजेचे आहे. यानुसार देशात दहा लाख हेक्टरवर औषधी वनस्पती लागवड करण्याचे नियोजित आहे."
भिमाशंकर औषधी वनस्पती आणि प्रक्रिया क्लस्टर हे 500 एकर वन क्षेत्रावर उभारण्यात यावे, या वनक्षेत्रावर उत्पादित होणाऱ्या वन औषधींवर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया केंद्र देखील उभारण्यात यावे, असे आढळराव यांनी सुचविले आहे. आदिवासी समाजाचे औषधी वनस्पती लागवड व प्रक्रियेचे क्लस्टर भविष्यात रोजगाराचे उत्तम मॉडेल ठरून आदिवासी बांधवांना आत्मनिर्भर बनविण्यात महत्वाचा टप्पा ठरेल अशी खात्री आढळराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
हे देखिल वाचा - नीलेश राणे आदित्य ठाकरेंवर घसरले
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.