औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करावे, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे. राज्याच्या सत्तेत महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसने संभाजीनगरच्या नामांतराला ठामपणे विरोध दर्शविला असला, तरी शिवसेनेने मात्र संभाजीनगर होणारच असे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. औरंगाबादेत विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर येणार असल्याचे सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात विविध विकास कामांच्या उद्घाटनाच सपाटा शिवसेनेकडून सुरू आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेसह सफारी पार्क व (स्व.) बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर आज राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहरातील कचरा प्रकल्पांसह विविध विकास कामांचे उद्घाटन होत आहे.
तत्पूर्वी शहरातील स्मार्ट बस शहर थाब्यांची तसेच अमरप्रीत चौकातील (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या म्युरलचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पत्रकारांनी त्यांना संभाजीनगरच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारला. यावर लवकरच संभाजीनगरच्या नामांतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.
शहरात महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेने विविध विकास कामे केली आहेत. स्मार्ट सिटीसह शहरातील जनतेला खंडित पाणीपुरवठा करण्यासाठी 1680 कोटी रुपयांच्या योजनेचा देखील नारळ फुटला आहे. खऱ्या अर्थाने हे शहर स्मार्ट होत असल्यामुळे संभाजीनगरला सुपर संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचेही देसाई यांनी या वेळी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.