कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेनेने गावातील 6 जागांवर विजय मिळवला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पाटील यांच्या खानापूर गावामध्ये भाजपने-काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होती. शिवसेनेला शह देण्यासाठी स्थानिक नेते एकत्र आले होते. मात्र, तरीही शिवसेने 6 जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून आणली आहे. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी खानापूरमध्ये विजय खेचून आणला आहे.
शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्या मूळ गावातील खानापूर गावात सत्तांतर घडवलं आहे. खानापूरमध्ये सेनेनं 6 जागांवर विजय मिळवला आहे. तर अजून तीन जागांची मतमोजणी सुरुआहे. शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांनी बाजी मारली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, शिवसेनेचा वारु रोखण्यासाठी भाजपने चक्क ‘हाता वर‘घड्याळ’ बांधले होते. या प्रकाराची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली होती. भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे स्थानिक नेते एकत्र होते.
प्रकाश आबिटकरांनी करुन दाखवलं
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं होते.
खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली होती. प्रकाश आबिटकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. सत्ता खेचून आणण्यासाठी आबिटकरांनी कंबर कसली होती. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी रंगतदार निवडणूक पाहायला मिळाली होती. मात्र, प्रकाश आबिटकरांनी खानापूरमध्ये विजय मिळवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास गिफ्ट दिलं आहे.

