कोल्हापूर : नियमित कर्ज भरणाऱ्या व दोन लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी 30 जून पर्यंत आपले कर्ज पूर्ण भरावे तरच ते शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र होतील, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली.
राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत राज्यातील 30 लाख 12 हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी 19 लाख शेतकऱ्यांना कोरोना संकटांच्या आधी 12 हजार कोटी रुपये कर्जमाफी दिली आहे. सार्वजनिक निवडणुकीची आचारसंहिता व तांत्रिक अडचणीमुळे 11 लाख 12 हजार शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपये द्यावयाचे आहेत. कोरोना या विषाणूच्या संकटामुळे सगळे जग संकटात आले असून आर्थिक फार मोठा फटका बसला आहे. आपल्याही राज्याचे आर्थिक स्त्रोत्र आटले असून कालच रिझर्व बॅंकेचे प्रमुख श्री. शक्तीकांत दास यांनी भारत देशाचा जीडीपी म्हणजेच विकासाचा दर झिरो टक्के राहील, असे जाहीर केल्यावर आमच्यासारख्या लोकांच्या पोटामध्ये गोळा उठला आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
तरीही राज्यसरकारने जे शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत. परंतु ; पैसे जमा झालेले नाहीत त्यांना या खरीप हंगामामध्ये कर्ज मिळावे म्हणून सर्व बॅंकांना स्वतःची थकहमी दिली असून शासनाच्या नावे येणे दाखवून शेतकऱ्यांची थकबाकी निरंक करून त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी हमी घेतली आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला जरी नाबार्डने परवानगी दिली नाही तरी आणि एनपीए झाली तरी बेहत्तर पण जिल्हा बॅंक अशा शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देईल. तसेच सर्व बॅंकांनी अशाप्रकारे करावे, अशी विनंती श्री. मुश्रीफ यांनी केली आहे.
उर्वरित नियमित कर्ज भरणारे व दोन लाखाच्यावरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची मुदत 30 जून पर्यंत असते त्यांनी, आपल्या घेतलेल्या कर्जाची पूर्णफेड केली तर त्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये व ज्यांची रक्कम दोन लाखांवरील आहे त्यांनाही दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. 30 जूननंतर नियमित कर्ज भरणारे शेतकरी किती? रक्कम किती व दोन लाखावर शेतकरी किती व रक्कम किती याची माहिती घेऊन निधीच्या उपलब्धतेनुसार शासन कर्जमाफी देण्यासाठी बांधील आहे. त्यामुळे 30 जूनपुर्वी संबंधितांनी कर्ज भरावे, असे आवाहन श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.