कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीत कळीचा मुद्दा असलेल्या ठरावदारांच्या सहलीचे नियोजन सुरू आहे. वाढत्या कोरोनामुळे काहींनी सहलीला जाण्यास नकार दिला असला तरी येत्या एक-दोन दिवसांत सहलीवर जाण्यास इच्छुक असलेल्यांना पाठवण्यात येणार आहे. कोकण, गोवा व कर्नाटकातील काही ठिकाणांना ठरावदारांनी प्राधान्य दिले आहे.
दरम्यान, येत्या 23 एप्रिलपासून हे ठरावदार सहलीवर पाठवण्याचे नियोजन आहे. तत्पूर्वी दोन दिवसांत सत्तारूढ आघाडीने काही ठरावदारांना सहलीवर पाठवल्याचे समजते. जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ठरावदारांच्या सभा घेण्यावर निर्बंध आहेत. काही गावांत कोरोनाग्रस्तांची संख्याही जास्त आहेत, त्यामुळे त्या गावांतील ठरावदार बाहेर पडायला तयार नाही. अशा स्थितीत प्रत्येक निवडणुकीत ठरावदारांची चैन ठरणाऱ्या सहली आयोजित करणे हे दोन्ही आघाड्यांसमोर अडचणीचे आहे.
सद्यःस्थितीत 80 टक्के ठरावदारांची मते निश्चित आहेत. त्यातही दोन्ही आघाड्यांशी बांधिल असलेल्या ठरावदारांपेक्षा शेवटच्या क्षणी बदलणारे ठरावदार दोन्ही आघाड्यांच्यादृष्टीने धोकादायक आहेत. अशा ठरावदारांवरच आघाड्यांचे लक्ष आहे आणि त्यातून अशा ठरावदारांनाच सहलीवर पाठवण्याचे नियोजन सुरू आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रासह जवळच्या कर्नाटक आणि गोवा राज्यातही आहे. काही राज्यांनी महाराष्ट्रांसाठी सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे ठरावदारांना सहलीवर पाठवायचे झाले तर ते कोठे पाठवायचे हाही मोठा प्रश्न नेत्यांसमोर आहे.
त्यातून मार्ग काढण्यासाठी कोल्हापूरपासून जवळ असलेल्या काही फार्म हाऊसबरोबरच कोकणात समुद्र किनारी असलेली रिसॉर्ट यासाठी निवडली आहेत. ऐन वेळी लॉकडाउन पुकारला तर सहलीवर पाठवलेल्या ठरावदारांना जिल्ह्यात आणायचे कसे, याचेही नियोजन निश्चित झाले असून, यासाठी काही स्वतंत्र कारभारी दोन्ही आघाड्यांनी कार्यरत केले आहेत.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.