बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी शहरातील नर्गिस दत्त मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल येथील कोविड सेंटरमधील दोन महिलांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात केली आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती, ऑक्सिजन पुरवठा योग्यरितीने, व्यवस्थितपणे सुरु होता. ऑक्सिजनमुळे रुग्णांचा मृत्यू झाला नाही, असा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. ही घटना रविवारी (ता. २५ एप्रिल) रात्री घडली.
अश्रूबाई लक्ष्मण सांगळे (वय ६५, रा. चुंब, ता. बार्शी), जनाबाई मधुकर बंडगर (रा. गणेशनगर, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. ऑक्सिजन संपला होता, त्यामुळेच रुग्ण दगावले असून नातेवाईकांना पूर्वसूचना का दिली नाही, असा सवाल मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला विचारला आहे.
चुंब येथील सांगळे यांची मुलगी भागाबाई ढाकणे यांनी सांगितले की, आई अश्रूबाई हीस श्वासाचा त्रास जाणवल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथून त्यांनी १७ एप्रिल रोजी कॅन्सर हॉस्पिटल येथे दाखल करण्यासाठी पाठवले. दोनच दिवसांपूर्वी आई निगेटिव्ह आली होती, जेवण व्यवस्थित जात होते. चांगले बोलत होती, काहींही त्रास होत नाही असे सांगत होती. पाचवे इंजेक्शन दिल्याने ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. रविवारी दुपारी तीनपासून रुममधील ऑक्सिजनचा सिलेंडर कर्मचाऱ्यांनी उभा करुन ठेवला होता. आम्ही चार-पाच जण सुशिक्षित आहोत, ऑक्सिजन कमी मिळतो आहे, हे लक्षात आले होते. साडेतीन वाजता तर संपूर्ण ऑक्सिजन संपला होता, असे लक्षात आले. उशीरा प्रशासनाने धावपळ करुन ऑक्सिजन पुरवठा सुरू केला. पण तोपर्यंत माझ्या आईचा जीव गेला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयातील मनोहर कर्णीकर (वय ७०, रा. यशनगर, सोलापूर) या रुग्णाचा मृत्यू सकाळी साडेदहा वाजता झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असून रविवारी दुपारी अडीचच्या दरम्यान गंभीर अवस्थेत रुग्ण दाखल झाला होता, असे सांगितले.
प्रशासनातील संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीप सोपल व संचालक बन्सीधर शुक्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. अश्रूबाई सांगळे, जनाबाई बंडगर हे दोन्ही रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. दररोज डॉक्टर रुग्णांची तपासणी करून उपचार करीत होते. दुःखाच्या आवेगात रुग्णाचे नातेवाईक आरोप करीत आहेत. दिवस-रात्र रुग्णांची काळजी घेतली जात होती. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही, खासगी हॉस्पिटल, खासगी प्लान्ट असणारे मुलगे, पठाण यांचेकडून सिलेंडर उपलब्ध करुन रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरु केला होता.
माजी मंत्री दिलीप सोपल म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या बैठकीतच सांगितले होते की, बार्शीच्या रुग्णालयात नेक टू नेक ऑक्सिजन पुरवठा होत आहे. ऑक्सिजन संपत येत असताना मिळतो. प्रांताधिकारी यांना याबाबत वारंवार सूचना, मेसेज पाठवले होते, तरीपण रविवारी सोलापूर येथे ऑक्सिजन मिळाला नाही. लोणंद येथे बिघाड झाल्याने उपलब्ध झाला नाही. फलटण येथे शेकडो वाहने ऑक्सिजनसाठी थांबली होती. तेथूनही उपलब्ध झाला नसतानाही ऑक्सिजन उपलब्ध करुन रुग्णांना सेवा दिली आहे.
रुग्णालयात सध्या ३८ रुग्ण आहेत, त्यापैकी २० जणांना ऑक्सिजन सुरु आहे, तर १३ जणांना ऑक्सिजनची गरज नाही. तीन जण पायपॅप मशिनवर आहेत.दोघांचा मृत्यू झाला इतर रुग्णांनाही ऑक्सिजन मिळाला नाही; म्हणून त्रास झाला असता, असे सांगून रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान तहसीलदार सुनील शेरखाने, नगरपरिषदेच्या आरोग्य विभाग प्रमुख ज्योती मोरे यांनी रुग्णालयास भेट दिली. आम्ही याबाबत रुग्णालयास प्रशासनाला पत्र माहिती मागवू आणि त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात येईल, असे तहसीलदार शेरखाने यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.