आमदार भालकेंची मागणी गोपीचंद पडळकरांनी विधान परिषदेत लावून धरली

केवळ पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना येथे हार पत्कारावी लागली होती.
MLA Bharat Bhalke's demand was raised by Gopichand Padalkar in the Legislative Council
MLA Bharat Bhalke's demand was raised by Gopichand Padalkar in the Legislative Council

पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी  35 गावांच्या पाणी प्रश्नासंबंधी गेली 11 वर्षे सातत्याने विधानसभेत आवाज उठवणारे आमदार भारत भालके यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या नसण्याची उणीव सभागृहासह मतदार संघातील जनतेलाही भासत आहे. त्यांच्या पश्चात रेंगाळलेला पाणी प्रश्नाविषयी सभागृहात कोण आवाज उठवणार असा प्रश्न असतानाच विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुढे येत मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांच्या उपसा सिंचन योजनेसाठी सरकारने तत्काळ निधी द्यावा, अशी सभागृहात मागणी लावून धरत येथील पाणीप्रश्नी आवाज उठवला.

त्यांच्या या मागणीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, आमदार पडळकरांनी मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याने दिवंगत आमदार भारत भालकेंची उणीव भरून काढल्याची भावना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणूक आणि येथील 35 गावांचा पाणी प्रश्न हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे समीकरण आहे. याच प्रश्नावर अनेक निवडणुका लढल्या गेल्या आणि त्या जिंकल्यासुध्दा; परंतु येथील पाणीप्रश्न अजूनही ‘जैसे थे’च आहे.

मतदारसंघ पुनर्चरचेत 2009 मध्ये पंढरपूर-मंगळवेढा असा नवा मतदार संघ तयार झाला. आमदार भारत भालके यांनी हाच कळीचा मुद्दा उचलून निवडणुकीचे रणशिंग फुंकले. दुष्काळी मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांना शेतीसाठी पाणी देतो. दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करतो, असे आश्वासन दिले होते. येथील जनतेनेही आपल्या शेतीला पाणी मिळणार म्हणून त्यावेळी भारत भालकेंना खंबीर साथ दिली होती. केवळ पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना येथे हार पत्कारावी लागली होती.

मंगळवेढ्यातील पाणी प्रश्नासंबंधी आमदार भारत भालके यांनी राज्य सरकारकडे अनेक वेळा प्रयत्न केले. परंतु ही योजना तांत्रिकदृष्ट्या अजून ही लालफितीत अडकून पडली आहे.  पुन्हा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पाणी प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामध्ये आमदार भारत भालके यांनी आमदार प्रशांत परिचारक यांचा पराभव करत बाजी मारली होती. दरम्यान राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आली. त्यामध्ये येथील पाणीप्रश्न पुन्हा पाच वर्षे रखडला. 

आमदार भारत भालकेंनी 2019 मध्ये  काॅग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवली. पुन्हा पाणीप्रश्नाची चर्चा झाली. येथील भोळ्याभाबड्या लोकांनी पुन्हा आमदार भारत भालकेंना साथ दिली. यामध्ये आमदार भारत भालकेंनी भाजपचे उमेदवार  माजी आमदार सुधाकर परिचारक आणि अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांचा दारूण पराभव केला. परंतु निवडणुकीनंतर एका वर्षातच आमदार भारत भालके यांचे अकाली निधन झाले.
 
त्यांच्या निधनामुळे आता विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक डोळयासमोर ठेवून पुन्हा पाणी प्रश्न चर्चेचा विषय ठरणार आहे.

दरम्यान भाजप आमदार  गोपीचंद पडळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवेढा येथील दुष्काळी भागातील 35 गावांसाठी मंजूर असलेल्या  उपसिंचन योजनेला निधी द्यावा, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर मतदार संघातील  दुष्काळी भागात पाणी प्रश्नाविषयी चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com